बाल रक्षा भारत संस्थेने केलेले काम उल्लेखनीय - आमदार दीपक केसरकर

सावंतवाडी
मुलांनी चांगला आहार केला तर त्यांना चांगले आरोग्य लाभू शकते. बाल रक्षा भारत यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. ही मुले भारताचे भविष्य आहे, ही मूल चांगली घडली तर देश चांगला घडेल असे गौरवोद्गार माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी काढले. बाल रक्षा भारत संस्था संचलित 'इट राईट स्कूल' प्रकल्प अंतर्गत प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.आमदार केसरकर म्हणाले, या मुलांना घडविण्याचे काम शिक्षक करतात. आपल्या जिल्ह्याच नाव उज्वल करण्यात या शिक्षकांचा मोठा वाटा असून त्यांचा मला अभिमान आहे. शालेय शिक्षणमंत्री असताना सकस मुलांच्या आहारासाठीचा प्रस्ताव आला होता. बहुतांश शाळांत हा उपक्रम सुरु असून चांगला उपक्रम तुम्ही राबवत आहात असे ते म्हणाले.
श्री. केसरकर यांच्या हस्ते तालुक्यातील विविध शाळांना या प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. बाल रक्षा भारत, इम्प्लीमेंटिंग सेन्सा, फुड स्टॅण्डर अँड सेफ्टी अथॉरिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून सकस व संतुलित आहाराबाबत मुलांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. यावेळी मुलांनी सकस आहाराबाबत जागृती करणारी गीते सादर केली.यावेळी प्रोजेक्ट मॅनेजर मिर्झा बेग, प्रोग्राम हेड प्रदीप मिश्रा, सहाय्यक प्रोजेक्ट मॅनेजर अपर्णा जोशी, प्रभारी प्राचार्य प्रा. महेंद्र ठाकुर, रणजीत सावंत आदींसह शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.