वेंगुर्ला तालुक्यातुन परुळे गाव ठरली पाण्याचे वॉटर एटीएम सुरू करणारी पहिली ग्रामपंचायत

वेंगुर्ला
जस जसा उन्हाळा वाढत जात आहे तशी पाण्याची समस्या गंभीर होत आहे .यावेळी महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात पाणीटंचाई भेडसावत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळे बाजार ग्रामपंचायतीने मात्र पाण्याचे योग्य नियोजन करून गावातील नव्हे तर आजूबाजूच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थ व पर्यटकांना थंड पाण्याची वॉटर एटीएम सुविधा उपलब्ध करून पाण्याबाबत योग्य आदर्श निर्माण केला आहे. वेंगुर्ला तालुक्यातील परुळे बाजार ग्रामपंचायत ही पाण्याचे वॉटर एटीएम सुरू करणारी पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी यांनी योग्य नियोजन करून स्मार्ट ग्राम योजना व संत गाडगेबाबा ग्राम अभियान बक्षीस रक्कम योजना यांचे अभिसरण करून पाच लाख रुपये खर्च करून हा प्लांट उभा केला आहे. सदर प्लांटमध्ये २० लिटर पाण्याचे १०० जार आहेत. त्यामुळे गावात व आजूबाजूच्या पंचक्रोशीत लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, गावातील दुकानात व पंचक्रोशीतील सर्व हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात या पाण्याच्या जारसाठी मागणी येत आहे. त्याप्रमाणे पुरवठा देखील केला जात आहे. सदर प्लांट हा गावातील बेरोजगार मुलांमार्फत चालविला जात आहे. त्यामुळे या उपक्रमाने गावातील मुलांनासुद्धा रोजगार उपलब्ध करून दिला आहे. सदर प्लांट पासून ग्रामपंचायतीला वार्षिक रुपये ६०,००० उत्पन्न मिळत आहे. ग्रामपंचायतीने या मधून लोकांना चांगली पाण्याची सेवा गावातील बेरोजगार मुलांना रोजगार व ग्रामपंचायत आर्थिक उत्पन्न वाढविण्याचे साधन असा तिहेरी संगम साधला आहे. हा प्लाॅट उभारण्यासाठी मार्गदर्शन जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा पं ) विशाल तनपुरे, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग विनायक ठाकूर, गटविकास अधिकारी वेंगुर्ले दिनेश पाटकर, विस्तार अधिकारी धुरी, निलेश सामंत, परुळे बाजार ग्रामपंचायत सरपंच प्रणिती आंबडपालकर, संजय दुधवडकर, माजी सरपंच तथा सदस्य प्रदीप प्रभू, ग्रामपंचायत सर्व सदस्य, माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी वर्ग व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हा प्लांट उभा राहिला अशी माहिती ग्रामविकास अधिकारी शरद शिंदे यांनी यावेळी दिली. तर थंड पाण्याचे वॉटर एटीएम ग्रामपंचायत परुळे बाजार यांचा उपक्रम जिल्ह्यासाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला आदर्श उपक्रम ठरत आहे.