पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त वेंगुर्ल्यात परिसंवादाचे आयोजन

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त वेंगुर्ल्यात परिसंवादाचे आयोजन

 


वेंगुर्ला


     भारताच्या इतिहासात सशक्त व न्यायप्रिय प्रशासनाचे प्रतीक ठरलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त ३१ मे रोजी दुपारी ३.३० वाजता वेंगुर्ला नगर परिषदेच्या स्वामी विवेकानंद हॉल येथे एक विचारप्रवर्तक परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम आनंदयात्री वाङ्मय मंडळ, वेंगुर्ला आणि वेंगुर्ला नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राचे अध्यक्षस्थान वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हेमंत किरूळकर भूषविणार आहेत. यावेळी आनंदयात्रीच्या अध्यक्षा आणि जेष्ठ लेखिका वृंदा कांबळी, प्रसन्ना देसाई, माजी नगरसेवक प्रशांत आपटे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या परिसंवादात ह्रदयनाथ गावडे, सीमा मराठे, प्रितम ओगले, राम पोळजी, स्नेहा नारिंगणेकर, पांडुरंग कौलापुरे, राजू परब हे  वक्ते सहभागी होणार असून, अहिल्याबाईंच्या समाजकल्याणाची दृष्टी, स्त्री नेतृत्व, सुशासन, न्यायनिष्ठ व धर्मपरायण प्रशासन अशा विविध पैलूंवर सखोल चर्चा करण्यात येणार आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी अठराव्या शतकात महिलांना नेतृत्वाची, समाजसेवेची आणि प्रशासनाची एक आदर्श दिशा दिली. त्यांनी अनेक धार्मिक स्थळांचे पुनरुत्थान केले, गोरगरीबांसाठी नीतिमूल्यांची जपणूक केली आणि राज्यकारभारात न्याय, समतेचा पुरस्कार केला. त्यांच्या अशाच दूरदृष्टीपूर्ण कार्याची उजळणी व आधुनिक समाजात त्यांचे विचार कसे लागू पडतात, याचा अभ्यास या परिसंवादाच्या माध्यमातून होणार आहे. आजच्या सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक परिस्थितीत अहिल्याबाईंच्या जीवनमूल्यांचा अभ्यास नव्या पिढीला दिशादर्शक ठरू शकतो. त्यांच्या कार्यातून मिळणारी प्रेरणा ही आजही सामाजिक परिवर्तनासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे वेंगुर्ला आणि परिसरातील नागरिकांनी या वैचारिक पर्वात सक्रिय सहभाग नोंदवावा, विचारमंथनात सामील व्हावे आणि या परिसंवादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.