आई वडिलांचे छत्र हरपलेल्या दिव्यांग रेश्मा कदम विवाह बंधनात

कुडाळ
कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील रेश्मा संभाजी कदम या ८०% दिव्यांग भगिनीचा विवाह जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्गचे संयोजक अनिल शिंगाडे यांच्या पुढाकाराने व पुणे येथील सामाजिक कार्यकर्त्या भाग्यश्री मोरे यांच्या पुढाकाराने बीड जिल्ह्यातील नितीन जय गावकर यांच्याशी सदाशिव पेठ विठ्ठल मंदिर पुणे या विवाह संस्थेच्या माध्यमातून संपन्न झाला. यासाठी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे संयोजक अनिल शिंगाडे यांनी विवाह स्थळी नेण्यापासून ते विवाहसाठी लागणाऱ्या सर्व जबाबदाऱ्या पालकत्वाच्या नात्याने पार पाडल्या. त्यांच्यासोबत सुनील जाधव हे सहभागी झाले होते. यापूर्वी शिंगाडे यांनी आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या रेश्मा कदम या भगिनीला वेळोवेळी दिव्यांगांसाठी असणाऱ्या सेवा, सुविधा, अन्न, निवारा यासारख्या प्राथमिक गरजा भागवण्यासाठी सहकार्य केलेले होते. आता खऱ्या अर्थाने तिचे जीवन समृद्ध झाले आहे. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र हे वेळोवेळी दिव्यांग बांधवांसाठी मायेचा आपुलकीचा हात देऊन त्यांचे जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करते आणि आज रेश्मा कदम हिचा विवाह संपन्न करून एक आदर्श समाजासमोर ठेवला आहे.