UPSC अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल

UPSC  अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल


नवी दिल्ली 


        यूपीएससी पूर्व परिक्षा २०२५ साठी लोकसेवा आयोगाने अधिसूचना जारी करून अर्ज मागवले आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ११ फेब्रुवारी आहे. या अधिसूचनेनुसार, अर्ज प्रक्रियेत गेल्यावर्षीच्या तुलनेत काही बदल आयोगाने केले आहेत. या बदलांचे कारण, परिक्षा पद्धती आणि अर्ज प्रक्रियेत बडतर्फ आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरने केलेला गैरप्रकार असल्याचे सांगितले जात आहे. खेडकरने प्रकरणातील गैरप्रकारासारख्या गोष्टी टाळण्यासाठी आयोगाने हे पाऊल उचलले असल्याचे समजते. या बदलांचे स्वागत होत आहे.त्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. लांबलचक अर्ज प्रक्रियेमुळे विद्यार्थी गोंधळात पडले असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.पूजा खेडकर प्रकरणामुळे यूपीएससी परिक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी आयोगाने हे बदल केल्याचे समजते. त्यामुळे यूपीएससी पूर्व परिक्षेसाठीचा अर्ज दाखल करताना विद्यार्थ्यांना लांबलचक प्रक्रियेतून जावे लागत आहे. पूजा खेडकरने केलेल्या कृत्यामुळे देशभरातील नागरी सेवा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागत आहे.यूपीएससीने जारी केलेल्या २०२५ पूर्व परिक्षेच्या अधिसूचनेतील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे अर्ज प्रक्रियेची पुनर्रचना होय. या अगोदरच्या पद्धतीनुसार यूपीएससी पूर्व परिक्षेसाठीचा अर्ज दाखल करताना विद्यार्थ्यांना केवळ प्राथमिक माहिती सादर करावी लागायची. त्यानंतर मुख्य परिक्षेसाठी काही माहिती भरावी लागायची आणि शेवटी मुलाखतीसाठी निवड झाली. तर संपूर्ण माहिती भरावी लागायची. आता मात्र, तिन्हीवेळी भरावी लागायची माहिती एकदाच पूर्व परिक्षेचा अर्ज भरताना सादर करावी लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली आहे.


अर्ज प्रक्रियेत कोणते बदल?

- या अगोदर तपशीलवार अर्ज भाग१ आणि भाग १ (डॅफ-१ आणि डॅफ-२) पूर्व परिक्षेनंतर भरावे लागायचे. मात्र, आता पूर्व परिक्षेचा अर्ज भरतानाच विद्यार्थ्यांना डॅफ-१ आणि डॅफ-१ मधील तपशील भरावा लागत आहे.

- विद्यार्थांनी आता पूर्व परीक्षेच्या अर्जासोबत जन्मतारीख पुरावा, आरक्षण प्रमाणपत्र आणि शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र यासारखी कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. यापूर्वी केवळ आरक्षण प्रमाणपत्र इत्यांदीचा क्रमांक सादर करावा लागायचा.

- मागील वर्षांपर्यंत मुख्य परीक्षेच्या निकालानंतर सेवा प्राधान्ये (सर्व्हिस प्रीफ्रन्स) द्यावा लागायचा. मात्र, आता विद्यार्थ्यांनी पूर्व परिक्षेचाच अर्ज भरताना त्यांच्या सेवा प्राधान्ये निवडणे आवश्यक आहे.

- पूर्व परिक्षेतून पात्र ठरलेल्या उमेदवारांना आता मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करताना २०० रुपये स्वतंत्रपणे भरावे लागतील (सूट दिलेली श्रेणी वगळता).

- विद्यार्थ्यांना आता पूर्व परीक्षेच्या निकालाच्या १० दिवसांच्या आत त्यांचे कॅडर प्राधान्ये सादर करणे आवश्यक आहे. यापूर्वी, डॅफ-२ मध्ये मुख्य परीक्षेच्या निकालानंतर कॅडर पसंती सादर करावी लागत असे