डॉ. अमेय देसाई यांची नागरी संरक्षण दलाच्या मानसेवी मुख्यालय अधिकारीपदी नियुक्ती
मुंबई
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागांतर्गत कार्यरत असलेल्या नागरी संरक्षण दलाच्या मानसेवी मुख्यालय अधिकारीपदी सिंधुदुर्गचे सुपुत्र डॉ. अमेय प्रभाकर देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरी संरक्षण क्षेत्रातील कार्य, सामाजिक जाणीव, संघटन कौशल्य आणि आपत्कालीन परिस्थितीत प्रभावी समन्वय साधण्याची क्षमता यांची दखल घेत शासनाने ही जबाबदारी सोपवली आहे.गृह विभागाकडून 30 जून 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या अधिकृत आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी संरक्षण दलाच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळकटी देण्यासाठी राज्यातील निवडक मानसेवी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यात डॉ. देसाई यांचा समावेश आहे. आदेशावर नागरी संरक्षण दल, बृहन्मुंबईचे मुख्य क्षेत्ररक्षक रविंद्र वाडेकर तसेच अतिरिक्त नियंत्रक नरसिंग यादव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. नागरी संरक्षण अधिनियम 1968 अंतर्गत ही नियुक्ती झाली आहे.नागरी संरक्षण दल हे आपत्ती व्यवस्थापन, नैसर्गिक संकटे, आग, पूर, भूकंप, अपघात तसेच अन्य आपत्कालीन परिस्थितींमध्ये प्रशासनाला सहाय्य करणारे महत्त्वाचे स्वयंसेवी संघटन आहे. नागरिकांचे संरक्षण, जनजागृती, स्वयंसेवकांचे प्रशिक्षण, आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था आणि विविध शासकीय विभागांमध्ये समन्वय राखण्याचे कार्य या दलामार्फत केले जाते.डॉ. देसाई यांच्या नियुक्तीमुळे नागरी संरक्षण दलाच्या कार्याला अधिक गतिमान स्वरूप प्राप्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ स्वयंसेवक प्रशिक्षण, संघटन विस्तार, नागरिक सुरक्षा जनजागृती आणि आपत्ती व्यवस्थापन उपक्रमांना होणार आहे.डॉ. अमेय देसाई हे सामाजिक, शैक्षणिक आणि सार्वजनिक क्षेत्रात सातत्याने सक्रिय आहेत. विविध सामाजिक उपक्रम, जनजागृती मोहिमा, युवक संघटनांचे मार्गदर्शन, आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्य यामधून त्यांनी समाजाशी घट्ट नाते निर्माण केले आहे. त्यांच्या कार्यपद्धतीत शिस्त, नियोजन, नेतृत्व आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा संगम दिसतो. डॉ. देसाई यांच्या नियुक्तीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. राज्याच्या गृह विभागांतर्गत असलेल्या महत्त्वाच्या नागरी संरक्षण व्यवस्थेमध्ये जिल्ह्याच्या प्रतिनिधीला स्थान मिळाल्याने विविध स्तरांतून समाधान व्यक्त होत आहे.सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. देसाई यांचे अभिनंदन करत भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. नागरी संरक्षण दलाच्या माध्यमातून राज्यातील नागरिक सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी ते प्रभावीपणे कार्य करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
konkansamwad 
