दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांचे तब्बल १२ लाखांहून अधिक बुकिंग रद्द

मुंबई
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटन उद्योगाची अवस्था वाईट झाली आहे. पहलगाम हल्ल्याचा सर्वात मोठा परिणाम काश्मीरमधील लोकांवर, दुकानदारांवर, हॉटेल मालकांवर, गाईडवर आणि पर्यटनावर आपला उदरनिर्वाह करणाऱ्या सर्वांवर झाला आहे.२०२४ च्या नोंदीनुसार, २ कोटी ३६ लाख लोक काश्मीरला भेट देण्यासाठी आले होते. दररोज सुमारे ९५०० पर्यटकांनी हॉटेल्स भरलेली असत, टॅक्सी बुक केलेल्या असत, बाजारपेठा गजबजलेल्या असत पण या एका हल्ल्यानंतर परिस्थिती अचानक बदलली. भीतीमुळे पर्यटक त्यांचे येथील पर्यटन रद्द करत आहेत.पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आतापर्यंत १२ लाखांहून अधिक बुकिंग रद्द करण्यात आली आहेत. ट्रॅव्हल एजंटना काश्मीरच्या सहली रद्द करण्याचे किंवा पुढे ढकलण्याचे सतत फोन येत आहेत. दहशतवाद्यांनी पर्यटकांना ज्या पद्धतीने मारले त्यामुळे लोक घाबरले आहेत. पुढचे ७ ते ८ महिने कोणी काश्मीरला जायला धजावणार नाही, असे चित्र निर्माण झाले आहे.स्थानिक हॉटेल मालक म्हणत आहेत की, करोनानंतर व्यवसाय थोडासा सावरला होता, पण पुन्हा एकदा आणखी एक मोठा धक्का बसला आहे. येथील पर्यटन क्षेत्र राज्याच्या अर्थव्यवस्थेत ८% योगदान देते. पर्यटनामुळे येथील लोकांना हॉटेल्स, टॅक्सी, खाद्यपदार्थांची दुकाने, हस्तकला आणि सुक्या मेव्याची विक्री अशा ठिकाणी रोजगार मिळतो.सध्या पहलगामच्या आसपासच्या भागात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. लोकांना अनेक ठिकाणी जाण्याची परवानगी नाही. अशा परिस्थितीत पर्यटकांना असुरक्षित वाटत आहे.