नांदेडमध्ये दूषित पाणी प्यायल्याने ३०० जणांना विषबाधा. ६ जणांची प्रकृती गंभीर; रुग्णालयात उपचार सुरू.

नांदेडमध्ये दूषित पाणी प्यायल्याने ३०० जणांना विषबाधा.   ६ जणांची प्रकृती गंभीर; रुग्णालयात उपचार सुरू.

नांदेड.

    नांदेड जिल्ह्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. नांदेडमधील नेरली गावात दूषित पाणी प्यायलयाने तब्बल ३०० जणांना विषबाधा झाली आहे. यातील काही जणांची प्रकृती ही गंभीर झाली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. विषबाधा झालेल्या नागरिकांना तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आले आहे.
   सार्वजनिक पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीतील पाणी प्यायल्याने नागरिकांना उलट्यासह चक्कर व डोकेदुखी होऊ लागली. अचानक मोठ्या प्रमाणात नागरिक आजारी पडल्याने त्यांना तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आले आहे. या घटनेमुळे शुद्ध पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नांदेड जवळच असलेल्या नेरली कुष्ठधाम येथे काही नागरिकांना अचानक शुक्रवारी मध्यरात्री उलटी, जुलाब, डोकेदुखी, चक्कर येऊ लागली. सुरवातीला काही नागरिकांना त्रास झाला. यानंतर अनेकांनी या प्रकारच्या त्रासाची तक्रार केली. अचानक आजारी नागरिकांची संख्या वाढू लागली. यातील काही जणांची प्रकृती ही गंभीर झाली.
   मध्यरात्री झालेल्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. आजारी नागरिकांना तातडीने रात्री १२ वाजता नांदेडमधील खासगी व शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख व डॉक्टरांच्या पथकाने नेरली कुष्ठधाम येथे जात आजारी नागरिकांवर उपचार करण्यास सुरुवात केली. काही जणांची प्रकृती ही गंभीर होती. त्यामुळे त्यांना तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आले. आज शनिवार पहाटे चार वाजेपर्यंत तब्बल ३०० रुग्णांना नांदेडच्या विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामध्ये लहान मुळे, महिला आणि वृद्ध नागरिकांचा समावेश आहे.
    स्थानिक नागरिकांनी सुरुवातीला त्यांच्या गाडीतून रुग्णांना दवाखान्यात दाखल केले. मात्र, आजारी व्यक्तिंची संख्यावाढल्यावर रुग्णवाहिका बोलावण्यात आली. तसेच आरोग्य पथक देखील दाखल झाले. तब्बल सात रुग्णवाहिका व खाजगी वाहनातून नागरिकांना दवाखान्यात भरती करण्यात आले. पोलिसांचे पथक देखील गावात दाखल झाले होते. त्यांनी देखील नागरिकांना दवाखान्यात नेण्यास मदत केली. या घटनेत सहा जणांची प्रकृती ही गंभीर आहे. या सर्वांना पाण्यातून विषबाधा झाल्याचा संशय ग्रामस्थांनी वर्तवला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यावर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी देखील या घटनेची माहिती घेतली असून आरोग्य यंत्रणेला योग्य त्या उपाय योजना करण्यास सांगण्यात आले आहे.