आडाळी एमआयडीसीतील भुखंड दर कमी करण्यासाठी लवकरच बैठक - मंत्री उदय सामंत

आडाळी एमआयडीसीतील भुखंड दर कमी करण्यासाठी लवकरच बैठक - मंत्री उदय सामंत

 

सावंतवाडी


 

      सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने पर्यटकांवर आधारित उद्योग आणले पाहिजेत याकडे लक्ष दिले जाईल. तसेच दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसी मधील भुखंड दर कमी करण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक घेतली जाईल. सिंधुदुर्ग वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाबाबत आपण लक्ष घालू असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. आडाळी एमआयडीसी मध्ये येऊ पहाणाऱ्या फॉर्मासिटिकल उद्योजकांची आमदार दीपक केसरकर यांच्या पुढाकाराने बैठक झाली आहे. तसेच आडाळी एमआयडीसीचे दर जास्त आहेत ते कमी करण्यासाठी येत्या पंधरा दिवसात बैठक आयोजित करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने या ठिकाणी पर्यटनावर आधारित प्रकल्प आणले पाहिजेत. त्यासाठी आपण आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे यांच्या विचारांने निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले.सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असूनही रुग्णांना गोवा राज्यात जावे लागते असे विचारले असता ते म्हणाले, आपण याबाबत नक्कीच आढावा घेऊन बोलेन. रत्नागिरीमध्ये मी वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर व साधने कमी करु दिली नाहीत. तसेच उद्योजकांना त्यांच्या शर्तीनुसार सवलत दिली आहे त्यामुळे ते गुंतवणूक करत आहेत असे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले.पर्यटन जिल्हा असूनही समुद्राजवळ मायनिंग प्रकल्प येऊ पाहत आहेत असे विचारले असता लोह खनिज बाबतीत धोरण केंद्र व राज्य सरकारने ठरविले आहे असे उदय सामंत म्हणाले.उध्दव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेबाबत विचारले असता उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, कुटुंब म्हणून एकत्र येत असतील तर कोणाचे काही म्हणणे असण्याचे कारण नाही. पण राज ठाकरे कोणाच्या अटी मानतील असे मला वाटत नाही. बालिश पणाला राज ठाकरे दबणार नाही. एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहू नकोस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मैत्री ठेवू नकोस म्हणून सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे तो बालिश पणा असल्याचा टोला उध्दव ठाकरे यांना सामंत यांनी लगावला.