पौष्टिक तृणधान्य उपअभियान (श्रीअन्न) पिक प्रात्यक्षिकासाठी २९ मेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी
राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि पोषण अभियानः पौष्टिक तृणधान्य उपअभियान (श्रीअन्न) पिक प्रात्यक्षिकासाठी जिल्ह्यातील शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या सहकारी संस्थानी mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर 29 मे पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि पोषण अभियान- पौष्टिक तृणधान्य उपअभियान (श्रीअन्न) अंतर्गत नाचणी, वरी या पौष्टिक तृणधान्याचे क्षेत्र व उत्पादकता वाढीसाठी पिक प्रात्यक्षिके जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. पिक प्रात्यक्षिके शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था इ. द्वारे राबविण्यात येणार आहे. शेतकरी गट हा 31 मार्च 2024 पूर्वी नोंदणी केलेला असावा. शेतकरी गट कोणत्याही शासन यंत्रणेकडे नोंदणीकृत असावा (आत्मा, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), महिला आर्थिक विकास महामंडळ, नाबार्ड इ.) एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस लाभ देय राहील. पिक प्रात्यक्षिकासाठी MahaDBT पोर्टलद्वारे नोंदणीकृत शेतकरी गट, कंपनी, संस्था निवड प्रथम अर्ज करण्यास प्रथम प्राधान्य (FCFS) या तत्त्वावर करण्यात येणार आहे. पिक प्रात्यक्षिकासाठी निवडलेल्या गटात शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्यास संबंधित गटाने 25 शेतकऱ्यांची प्रात्यक्षिकासाठी निवड करायची आहे. गटातील शेतकऱ्यांना पीक प्रात्यक्षिकाचा लाभ देताना शेतकऱ्याची Agristack वर नोंदणी असणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.