कणकवली येथे 'दामिनी’ पथकांना विशेष दुचाकींचे वितरण

कणकवली
महिलांची सुरक्षा हा पोलिस दलासाठी महत्त्वाचा विषय असून महिला सुरक्षेची जबाबदारी पोलिस समर्थपणे पार पाडत आहेत. पोलिस विभागातर्फे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत. महिलांच्या तक्रारी व त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाणे व पोलिस अधीक्षक कार्यालयात 'भरोसा महिला सेल', 'दामिनी' पथकांची स्थापना करण्यात आली आहे. दामिनी पथकांना महिलांच्या सुरक्षेसाठी घटनास्थळी तातडीने पोहोचण्यासाठी त्यांना विशेष दुचाकी देण्यात येत आहेत. सिंधुदुर्ग पोलिस दल महिलांच्या सुरक्षेसाठी सक्षम आणि सज्ज असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी केले. सिंधुदुर्ग पोलिस दलाच्या वतीने जिल्ह्यातील 13 पोलिस ठाण्यातील 'दामिनी' पथकांना दुचाकींच्या चाव्यांचे वितरण कणकवली पोलिस स्टेशन येथे अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्य हस्ते व अति. पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले यांच्या उपस्थितीत करण्यात आले. कणकवलीचे उपअधीक्षक घनश्याम आढाव, सावंतवाडीचे उप अधीक्षक विनोद कांबळे, कणकवली पोलिस निरीक्षक मारुती जगताप, विशेष शाखेचे पोलिस निरीक्ष सचिन हुंदळेकर, दोडामार्ग पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे, कणकवलीचे सहा. पोलिस निरीक्षक डॉ. ज्ञानेश सावंत यांच्यासह त्या त्या पोलिस ठाण्यांचे पोलिस निरीक्षक, अधिकारी, कर्मचारी तसेच महिला दक्षता कमिटी सदस्या मेघा गांगण, डॉ. सौ. प्रतिमा नाटेकर उपस्थित होत्या.पोलिस अधीक्षकांच्या हस्ते फित कापून या दुचाकींचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर 'दामिनी' पथकातील 13 दुचाकीस्वार महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी कणकवली पोलिस ठाणे ते पटवर्धन चौकमार्गे बाजारपेठ व छत्रपती शिवाजी चौक मार्गे पोलिस ठाणे अशी रॅली काढली. या रॅलीला पोलिस अधीक्षकांनी हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर पोलिस स्टेशन आवारात आयोजित कार्यक्रमात 13 पोलिस ठाण्यातील प्रत्येकी एक याप्रमाणे महिला पोलिस कर्मचाऱ्यांना दुचाकींच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या.मार्गदर्शन करताना पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल म्हणाले, पोलिस दलाच्यावतीने कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच विविध उपक्रमही राबवले जातात. पती-पत्नीतील कौटुंबिक वादांचे निराकरण करून कुटुंब टिकवण्यासाठी आवश्यक ते समुपदेशन केले जाते. ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सोडवले जातात. गतवर्षी 'भरोस सेल' कडे 100 ते 125 तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यातील 95 टक्के तक्रारदारांचे समुपदेशन करून त्या सोडवण्यात आल्या. पोलिस ठाण्यांमध्ये चारचाकी वाहने आहेत, परंतू एखाद्या महिलांच्या बाबतीतील घटनेवेळी तातडीने पोहोचण्यासाठी दुचाकी अधिक फायद्याची ठरते, ती सहजपणे गल्लीतूनही घटनास्थळी पोहोचू शकते. बऱ्याचवेळा पोलिस कर्मचारी गुन्ह्यांचा तपास व अन्य कामकाजात व्यस्त असतात. महिला, मुलींच्या समस्या जाणून घेण्यासाठी तातडीने घटनास्थळी पोहोचता यावे, शहरातून पेट्रोलींग करताना महिलांमध्ये निर्भयतेचा विश्वास निर्माण व्हावा, यासाठी जलदगतीने पोहोचणाऱ्या दुचाकी 'दामिनी' पथकाला देण्यात येत आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून शाळा, महाविद्यायात भेटी आणि गावभेठ कार्यक्रमांतर्गत महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थीनी, महिलांनी आपल्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर पोलिस दलही महिला सुरक्षेसाठी कटीबद्ध आहे. सध्या गुन्हेगार हायटेक पद्धतीने गुन्हे करत आहेत. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक पुरावे गोळा करण्यासाठी टॅब दिले जात आहेत, असेही पोलिस अधीक्षकांनी सांगितले.या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन पोलिस निरीक्षक नलिनी शिंदे यांनी केले. कार्यक्रमाला मोटर वाहन उपनिरीक्षक प्रदीप चव्हाण, प्रा. हरीभाऊ भिसे, प्रा. विजय सावंत, प्रा. वनिता सावंत यांच्यासह महाविद्यालयीन विद्यार्थिनी, महिला पोलिस कर्मचारी उपस्थित होत्या.