फेक न्यूजमुळे समोरच्याचे करिअर बाद करतोय का, हा विचार मनात आला पाहिजे : पालकमंत्री उदय सामंत. रत्नागिरीत रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकारांसाठी कार्यशाळा.

फेक न्यूजमुळे समोरच्याचे करिअर बाद करतोय का, हा विचार मनात आला पाहिजे : पालकमंत्री उदय सामंत.  रत्नागिरीत रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकारांसाठी कार्यशाळा.

रत्नागिरी.

   सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची ताकद ही खऱ्या अर्थाने पत्रकारिता आहे. समाज माध्यमांवर येणाऱ्या फेक न्यूजमुळे समोरच्याचे करिअर बाद करतोय का, हा विचार प्रत्येकाच्या मनात आला पाहिजे. त्यासाठी जोपर्यंत खात्री होत नाही, तोपर्यंत ते फॉरवर्ड करणे धोक्याचे आहे. रत्नागिरी जिल्ह्यात नव्याने होणाऱ्या प्रांत कार्यालयात पत्रकार कक्ष असेल, असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.
   कोकण विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांसाठी विकास पत्रकारिता कार्यशाळेचे येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते आद्यपत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन, कार्यशाळेला सुरुवात झाली. यावेळी उपसंचालक डॉ. गणेश मुळे, सेवानिवृत्त उपसंचालक सतीश लळीत, रायगडच्या जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, राज्य अधिस्वीकृती समिती सदस्य जान्हवी पाटील, कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष श्रीकांत चाळके, सदस्य प्रणव पोळेकर, सिंधुदुर्ग पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे, सिंधुदुर्ग इलेक्ट्रॉनिक मीडिया फोरमचे अध्यक्ष राजन नाईक, जिल्हा मराठी पत्रकार परिषदचे अध्यक्ष आनंद तापेकर, मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्ष मेहरुन नाकाडे, ज्येष्ठ पत्रकार दत्ता महाडिक आदी उपस्थित होते.
   पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, पत्रकारांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. जिल्ह्याचा, कोकणचा, आपल्या भागाचा विकास हे पत्रकारांच्या डोक्यात असते. सध्या राज्याला विकास पत्रकारितेची खरी आवश्यकता आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग, रायगड तळ कोकणातील पत्रकारांनी नव्या तंत्रज्ञानात काम केले पाहिजे. त्यासाठी एकमेकांमध्ये संवाद होण्याच्या दृष्टीने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. समाज माध्यमातून फेक नॅरेटिव्हमधून पॉलिटिकल करिअर बाद होऊ नये, याची देखील काळजी घेतली पाहिजे. समाज माध्यमांवर मोबाईलच्या सहाय्याने काहीही टाईप करायचे, समोरच्याला पाठवायचे, समोरच्याने आणखी त्यात भर घालायची आणि आणखी पुढे पाठवायचे, मग ते चांगले असू शकते वा वाईट असू शकते. सोशल मीडियाला संहिता नसल्याने कोणीही मत व्यक्त करु शकते. या सर्वामध्ये विशेषत: फेक बातमीमुळे समोरच्याचे करिअर बाद करतोय काय, हा देखील विचार प्रत्येकाच्या मनात आला पाहिजे.
   जिल्ह्यात लवकरच स्वतंत्र पत्रकार भवन निर्माण होणार आहे. पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी शासनस्तरावर निश्चितपणे पाठपुरावा केला जाईल. समाजातील सर्वसामान्य माणसांसाठी शासनाच्या विविध योजना, शासन स्तरावर झालेले निर्णय हे आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून पोहचवावेत, असे आवाहन पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले कोकणातील पत्रकारांनी अभ्यासपूर्ण लेखन करून कोकणच्या विकासात अजून काय नवे बदल करता येतील, याबद्दल मार्गदर्शन करण्याची अपेक्षा आहे. यासाठी पत्रकारांनी अन्य जिल्ह्यात जी विकास कामे सुरू आहेत त्यातील चांगले काय आपल्या जिल्ह्यात येऊ शकेल, याचाही अभ्यास करावा. जिल्ह्याने आतापर्यंत जी कामे केली आहेत त्या कामांचा संपूर्ण महाराष्ट्रात एक पॅटर्न निर्माण झाला आहे. याचा मला अभिमान आहे. आपल्या बातमीचा समाजावर विरुद्ध परिणाम होणार नाही, याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. असेही ते यावेळी म्हणाले. जिल्हा माहिती अधिकारी श्री. सातपुते यांनी सर्वांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले. रायगड जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती पिंगळे यांनी सर्वांचे आभार मानले. पत्रकार अनघा निकम यांनी सूत्रसंचालन केले. कार्यशाळेला रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.