नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपतींकडून राजीनामा मंजूर.

नवीदिल्ली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुधवारी दुपारी पंतप्रधानपदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सुपुर्द आहे. कॅबिनेटच्या बैठकीत लोकसभा विसर्जित करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. हा प्रस्ताव राष्ट्रपतींकडे सादर केल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा मंजूर केला आहे. नवीन सरकार येईपर्यंत ते काळजीवाहू पंतप्रधान असतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात दाखल झाले आणि त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सुपूर्द केला. राष्ट्रपती मुर्मूंनी हा राजीनामा स्विकारला असून आजपासून मोदी देशाचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून पदावर कायम राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये एकट्या भाजपला बहुमत मिळवता आले नसले तरी एनडीएला पूर्ण बहुमत मिळाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा सरकार स्थापनेची तयारी सुरू केली आहे. येत्या ८ किंवा ९ जून रोजी मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान मोदींनी आज सकाळी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांचा आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा सुपूर्द केला. तसेच, १७ वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस देखील केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शपथविधी सोहळ्याच्या तयारीसाठी राष्ट्रपती भवन ५ ते ९ जूनपर्यंत अभ्यागतांसाठी बंद राहणार आहे. "राष्ट्रपती भवनात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी समारंभाच्या आगामी कार्यक्रमाच्या तयारीमुळे, राष्ट्रपती भवन (सर्किट-1) ची भेट ५ ते ९ जून २०२४ पर्यंत सर्वसामान्यांसाठी बंद राहील," असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे ८ किंवा ९ जून रोजीच मोदी शपथ घेतील असे सांगितले जात आहे. त्याच दिवशी नवे केंद्रीय मंत्रिमंडळही शपथ घेईल.
भारतीय जनता पक्षाने - २०१४ मध्ये २८२ जागा आणि २०१९ च्या निवडणुकीत ३०३ जागा जिंकल्या होत्या. पण यावेळी त्यांना २४० जागाच जिंकता आल्या आहेत. बहुमताच्या आकड्यापेक्षा भाजपकडे ३२ जागा कमी आहेत. त्यामुळे यावेळी एनडीएच्या घटक पक्षांनी जिंकलेल्या ५३ जागांवर त्यांना अवलंबून राहावे लागणार आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपी आणि नितीश कुमार यांच्या जेडीयूसारख्या पक्षांकडे यावेळी सत्तेची चावी असण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशात टीडीपीने १६ जागा तर बिहारमध्ये जेडीयूने १२ जागा जिंकल्या आहेत.