रत्नागिरी गॅस व ऊर्जा प्रकल्प करणार १६७ स्थानिक कामगारांची कपात. नोटीस मिळालेल्या कामगारांची मनसेकडे धाव.

रत्नागिरी.
आरजीपीपीएल’मधील ब्रेक वाँटर प्रकल्पातील एकूण १६७ कामगारांची कपात करण्यात येणार आहे. १५ मेनंतर ही कपात करण्यात येणार असून तशी नोटीस एक महिन्यापूर्वीच कामगारांना देण्यात आली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा तापणार असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या कामागारांच्या बाजूने ठामपणे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
गुहागर तालुक्याच्या औद्योगिकीकरणात महत्वाची भूमिका बजावणारा आरजीपीपीएल प्रकल्प हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने वादाचा विषय बनला आहे. अगोदरच गँसच्या तुटवड्यामुळे कमी झालेली वीजनिर्मिती, वीजेचा महागडा दर अशामध्ये भरडला गेलेल्या या प्रकल्पाने यापूर्वीच मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केलेली आहे. यामध्ये सर्वाधिक स्थानिक कामगारच होते. या प्रकल्पाने आपल्या कार्यक्षेत्रातील अंजनवेल, वेलदूर, रानवी या तीन
ग्रामपंचायतींचा कोटीचा कर थकविला आहे. तसेच यावर्षीच्या ऐन पाणीटंचाईच्या काळात अंजनवेल गावाला ग्रा.पं. ने मागणी करुनही टँकरने पाणीपुरवठाही केलेला नाही.
अशा असंख्य कारणांनी आरजीपीपीएलवर येथील स्थानिकांची नाराजी असताना यामध्ये आता कामगार कपातीचा घेतलेला निर्णय स्थानिकांना उद्धवस्त करणारा
ठरला आहे. आरजीपीपीएलच्या दाभोळ ब्रेक वाँटर प्रकल्पातील सर्व आरएसडब्ल्यू कामगार जेएमएस अँपेक्स इन्फ्रामध्ये कार्यरत आहेत.त्यांना दिलेल्या नोटीसीत म्हटले आहे की, या प्रकल्पाची कामे पूर्णत्वास आली आहेत. हे लक्षात घेऊन नमूद कामगारांना कमी करण्यात येत असल्याची नोटीस देण्यात येत आहे, असे नमूद केले आहे. त्यामुळे १६७ कामगारांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.