प्रवाशांनी हंगामा केल्यावर ७ तास उशिराने सोडली कोकणात येणारी पर्यायी विशेष गाडी.

प्रवाशांनी हंगामा केल्यावर ७ तास उशिराने सोडली कोकणात येणारी पर्यायी विशेष गाडी.

मुंबई.

    मुंबईतील लो.टिळक टर्मिनस ते थीवी दरम्यान धावणारी साप्ताहिक विशेष गाडी शनिवारी रात्री १० वाजून १५ मिनिटांनी प्लॅटफॉर्मवर आलीच नाही.यामुळे या गाडीच्या प्रतीक्षेत असलेले शेकडो प्रवासी संतप्त झाले.नंतर त्यांना ही गाडी रात्री दोन वाजता सुटेल, असे सांगण्यात आले. नंतर पहाटे तीनची वेळ देण्यात आली. मात्र, तेव्हाही गाडी प्लॅटफॉर्मवर आल्यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी एकही गाडी सोडू देणार नाही, असा पवित्रा घेत जवळपास तासभर हंगामा घातला.अखेर मध्य रेल्वे प्रशासनाने रविवारी पहाटे ५ वाजून १० मिनिटांनी पर्यायी गाडी सोडली. रेल्वेचे नियोजन बिघडल्याने या गाडीने कोकणात येणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
  उन्हाळी हंगामासाठी कोकण रेल्वे मार्गावर विविध ठिकाणावरून नियमित गाड्यांव्यतिरिक्त विशेष गाड्या सोडल्या आहेत. यापैकी शनिवारी रात्री १० वा.१५ मिनिटांनी सुटणाऱ्या एलटीटी थीवी या गाडीचाही समावेश आहे.
    शनिवार दि.२० रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ही गाडी सुटण्यासाठी निर्धारित वेळेत आलीच नाही. नंतर ही गाडी रात्री दोन वाजता सुटेल असे सांगण्यात आले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी रात्री तीन ची वेळ दिली. मात्र तेव्हाह ही गाडी न आल्यामुळे या गाडीने येणारे प्रवासी संतप्त झाले. त्यांनी लोकमान्य टिळक टर्मिनसमधील रेल्वेच्या कंट्रोल केबिनमधील अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला. मात्र, त्यांच्याकडू समर्पक उत्तर न मिळाल्याने संतप्त प्रवाशांनी या ठिकाणाहून एकही गाडी सोडू देणार नाही, असा पवित्रा घेत सुमारे एक तास हंगामा घातला. अखेर रेल्वे प्रशासनाने नमते घेत सेकंड सीटिंग श्रेणीतील या गाडीच्या ऐवजी गोव्यातील थीवीकरिता रविवारी पहाटे ५ वाजून १० मिनिटांनी पर्यायी स्लीपर श्रेणीतील गाडी सोडली.
   या संदर्भात उपलब्ध माहितीनुसार एलटीटी-थिवी ही गाडी सोडण्यासाठीचा रेक अन्य ठिकाणाहून वेळी न आल्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाला संतप्त प्रवाशांच्या रोशाला सामोरे जावे लागले.
  01129 या क्रमांकाने धावणारी ही गाडी रविवारी कोकण रेल्वे मार्गावर आल्यानंतर ४ तास २७ मिनिटे उशिराने धावत होती. एकूणच रेल्वेचे नियोजन बिघडल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.