बुकिंग सुरु होताच आठ मिनिटांतच कोकण रेल्वे गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षण फुल्ल; प्रवाशी संतप्त.

मुंबई.
यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबई ते कोकण दरम्यान 202 विशेष रेल्वे गाडया चालवण्याच्या मध्य रेल्वेच्या नियोजनाला भारतीय रेल्वेने हिरवा कंदील दिला. कालपासून विशेष गाड्यांच्या आरक्षणास सुरुवात झाली. मात्र आरक्षण सुरू होताच पहिल्या आठ ते दहा मिनिटातच आरक्षण फुल झाले. यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
गणेशोत्सव म्हणजे कोकणातील सर्वात मोठा आणि आवडता सण. गणेशोत्सवाला मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात येतात. साधारण गणेश चतुर्थीच्या तीन दिवस आधीपासून कोकणातील मूळगावी जाण्याचे कोकणवासीयांचे नियोजन असते. यंदा गणेशोत्सवास 07 सप्टेंबर रोजी सुरुवात होणार असून या पार्श्वभूमीवर विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहे. कालपासून तिकीट आरक्षणास सुरुवातही झाली. मात्र, काही वेळातच आरक्षण फुल झाल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी प्रवासी संघटनांकडून करण्यात आली आहे.
गणेशोत्सवासाठी रेल्वेने सोडलेल्या गाड्यांचे आरक्षण सुरू होताच पहिल्या आठ ते दहा मिनिटातच आरक्षण फुल झाले. काही प्रवाशांनी अनेक प्रयत्न करूनही प्रतीक्षा यादीतच त्यांचे नाव राहिले. मागील वर्षी देखील अशाच प्रकारे आरक्षण काही मिनिटात फुल झाले होते. मागील वर्षी तिकीट आरक्षणात काळाबाजार झाल्याची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली होती. यंदाच्या तिकीट आरक्षणही काही मिनिटात फुल झाल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत.
दरम्यान, गेल्या वर्षी गणेशोत्सवाची तिकिटे काढताना कोकणकन्या एक्सप्रेसची प्रतीक्षा यादी अवघ्या दीड मिनिटांतच एक हजारांपार गेली होती. त्यानंतर तिकीट आरक्षणात गैरप्रकार झाल्याची शंका प्रवाशांकडून व्यक्त केली होती. तपासाअंती यात अनेक तिकीट आरक्षण खाती बनावट असल्याचे उघड झाले होते. यंदाही तिकीट आरक्षण काही मिनिटात फुल झाल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत. तिकीट आरक्षणाची चौकशी करा आणि दोषींवर कारवाई करा, अशी मागणी आता प्रवासी संघटनांकडून होत आहे.