श्री शिवप्रतिष्ठानचे धारकरी व सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक यांचा वेंगुर्ला येथे सत्कार

वेंगुर्ला
वेंगुर्ला माणिकचौक (छत्रपती शिवाजीमहाराज पुतळ्याजवळ) येथे "धर्मवीर बलिदान मास" पाळणारे श्री शिवप्रतिष्ठानचे धारकरी व सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक यांचा सत्कार करण्यात आला. सर्वप्रथम छत्रपति शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रा. स्व. संघाचे बाबुराव खवणेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यामध्ये त्यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना त्या नीच क्रूर औरंगजेबाने तब्बल 40 दिवस प्रचंड यातना देऊन छळ करीत मारले. म्हणूनच ही मुले फाल्गुन शुध्द प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या म्हणजेच 28 फेब्रुवारी ते 29 मार्च असा महिना आपल्या धाकल्या धन्याचे म्हणजेच शंभूराजांच्या बलिदानाच सुतक श्री शिवप्रतिष्ठानचे धारकरी व सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक पाळतात. यामध्ये श्रावणी गोकाककर, निधी परब, मानस परब, ओजस परब, गोविंदा कोळी, देवांग जगताप, यशराज कोयंडे, धारकरी प्रज्वल कोयंडे, सौ. प्रियांका कोयंडे तसेच मठ कावलेवाडी येथील धारकरी तेजसराव देसाई, साहिल परब, शुभम परब, आदिनाथ धर्णे हे सर्व निस्वार्थ धर्मवीर बलिदान मासाचे पालन करतात. विशेष म्हणजे आजच्या युगातसुद्धा श्रावणी गोकाककर, निधी परब, सौ. प्रियांका कोयंडे या स्वनिश्चयाने पायात चप्पल न घालता धर्मवीर बलिदान मास पाळतात. या सर्वांनी संपूर्ण एक महिना पायात चप्पल न घालणे, मुंडण करणे, चहा गोड पदार्थ न खाणे, मांसाहार न करणे, आवडीची गोष्ट न करणे, शुभ प्रसंग टाळणे असे त्याग केले आहेत. तसेच दररोज सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन दिवा लावणे. शंभूराजांना पुष्प अर्पण करुन श्री संभाजीसुर्यहृदय श्लोक म्हणून प्रत्येक श्लोकाचा अर्थ सांगून ध्येय मंत्र, प्रेरणा मंत्र म्हटले जातात. यावेळी सत्कार मुर्तींचे प्रतिनीधी प्रज्वल कोयंडे यांनी आपल्या मनोगतात धर्मवीर बलिदान मास हा प्रत्येक हिंदुधर्मियांनी पाळणे आवश्यक आहे. ज्यांच्या बलिदानामुळे आज आपल्या मंदिरात देवघरात देव्हारा आणि अंगणात तुळस, आई, बहिण, मुलगी, पत्नी यांना आदर आहे. आपण हिंदू म्हणून ताठ मानेन जगतो आणि त्यामागील राजांचा त्याग, त्यांचे समर्पण याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. शंभूराजांचे बलिदान वाचून, ऐकून व चित्रपट पाहून समजण्याएवढे सोपे नाही ते जाणून घेण्यासाठी पाळावा लागतो तो धर्मवीर बलिदान मासच. ह्या मुलांची प्रेरणा घेत असंख्य मुलांनी धर्मवीर बलिदान मास पाळला पाहिजे आणि सध्या ही काळाजी गरज बनली आहे असे मत व्यक्त केले. यासाठीच हिंदुधर्माभिमानी मंडळींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी असंख्य हिंदुधर्माभिमानी मंडळी उपस्थित होती.