मुंबई- गोवा महामार्गासाठी जनआक्रोश समितीचे आमरण उपोषण आंदोलन सुरू.

मुंबई- गोवा महामार्गासाठी जनआक्रोश समितीचे आमरण उपोषण आंदोलन सुरू.

रायगड.

  चौदा वर्षांपासून रखडलेला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि त्यातच सध्या पावसाळ्यात झालेली दुरावस्था याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जनआक्रोश समितीने माणगाव येथे आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे.आधी हा महामार्ग पूर्ण करा नाहीतर कोकणात येणारा एकही नवीन महामार्ग होऊ देणार नाही,असा इशाराच राज्य सरकारला कोकणवासियांनी दिला आहे.पनवेल आणि अलिबाग येथेही महामार्गाच्या कामासाठी आंदोलने करण्यात आली.मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या झालेल्या दुरावस्थेला सरकारची निष्क्रियताच जबाबदार असल्याचा आरोप करत जनआक्रोश समितीने गुरुवार पासून हे आंदोलन सुरू केले आहे. माणगावमध्ये समितीच्या वतीने निषेध रॅली काढण्यात आली. यामध्ये माणगावसह कोकणातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर निघालेल्या रॅलीमध्ये सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत महामार्ग रोखून धरण्यात आल्याने काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र पोलिसांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर महामार्गावरील आंदोलन स्थगित करत नियोजित जागेवरती आमरण उपोषण सुरू करण्यात आले.हा महामार्ग केव्हा पूर्ण होईल याबाबत खुद्द मुख्यमंत्र्यांकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या महामार्गाच्या दुरावस्थेमुळे झालेल्या अपघातात जे मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कसलेही आर्थिक सहाय्य केले जात नाही, अपघातात जखमी झालेल्यांना सहाय्य केले जात नाही याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. कोकणातील नागरिकांची उपजीविका पर्यटनावरती अवलंबून आहे मात्र रस्ता खराब असल्याने पर्यटकांनी कोकणाकडे पाठ फिरवली आहे. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला असल्याने त्याची नुकसान भरपाई राज्य सरकारने करून द्यावी, यासह विविध चौदा मुख्य मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.