जिल्ह्यात २८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोंबर रॅबिज आठवडा.

जिल्ह्यात २८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोंबर रॅबिज आठवडा.

सिंधुदुर्ग.

    जिल्ह्यात दरवर्षी 28 सप्टेंबरला 'जागतिक  रॅबीज दिवस' साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने  28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोंबरला जागतिक रॅबीज आठवडा साजरा करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी कळविले आहे.

रॅबीज संबंधिची माहिती खालीलप्रमाणे :-

रॅबीज कसा होतो? त्यावर उपचार काय? कोणताही कुत्रा चावल्याने रॅबीज होतो का? प्राण्याने त्यातही प्रामुख्याने कुत्रा चावल्यामुळे होणारा आजार म्हणजे 'रॅबीज'. हा आजार अत्यंत जीवघेणा असून, वेळीच आणि योग्य उपचार मिळाले तरच जीव वाचवता येऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, कुत्रा चावल्यानंतरच्या वैद्यकीय उपचारांबाबत सामान्यांमध्ये खूप कमी प्रमाणात जनजागृती आहे. यामुळेच, जगभरात दरवर्षी 59 हजारपेक्षा जास्त लोकांना रॅबीजमुळे आपले प्राण गमवावे लागतात.रॅबीजमुळे जगभरात होणाऱ्या मृत्यूपैकी 36 टक्के मृत्यू एकट्या भारतात नोंदवण्यात येतात. आशिया आणि अफ्रिकेत रॅबीजचा संसर्ग होण्याचं प्रमाण अधिक आहे. सामान्यांना या आजाराबाबत फार माहिती नाही. त्यामुळे सामान्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तर आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

 रॅबीज म्हणजे काय?

प्राण्यांनी चावल्यामुळे पसरणारा 'रॅबीज' हा एक व्हायरस म्हणजे विषाणूजन्य आजार आहे. रॅबीजचा व्हायरस रुग्णाच्या शरीरात शिरल्यानंतर सेंट्रल नर्व्हस सिस्टमवर, म्हणजेच मज्जासंस्थेवर हल्ला करतो. यामुळे रुग्णाच्या डोक्यात आणि मणक्यात सूज येते.जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, रॅबीज व्हायरस रुग्णाच्या डोक्यात शिरला तर रुग्ण कोमात जाऊ शकतो किंवा मृत्यू होऊ शकतो. काही रुग्णांमध्ये पॅरालिसिसची (लकवा) समस्या निर्माण होते. काहीवेळा रुग्णांच्या व्यवहारात अचानक बदल होतो आणि रुग्ण अधिक हायपर झालेले दिसून येतात."माणसाच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर रॅबीज व्हायरस अत्यंत वेगाने पसरण्यास सुरूवात होते".एकदा रॅबीजचं निदान झालं तर या आजारावर कोणताही ठोस उपाय नाही. त्यामुळे प्राणी चावल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय सर्वांत महत्त्वाचे आहेत.

 रॅबीज कसा पसरतो?

रॅबीज प्रामुख्याने जंगली प्राण्यांमध्ये पण काही प्रमाणात घरातील पाळीव प्राण्यांमध्येही आढळून येतो.रॅबीजचा संसर्ग झालेल्या प्राण्यांच्या लाळेतुन हा आजार पसरतो.नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या (NCDC) माहितीनुसार, प्राण्यांनी चावल्यामुळे, अंगावर ओरखडे मारल्यामुळे, माणसांच्या अंगावरची उघडी जखम चाटल्यामुळे प्राण्यांच्या लाळेतून रॅबीजचा विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतो.भारतात 95 टक्के प्रकरणात माणसांना रॅबीज होण्यामागे कुत्रा कारणीभूत आहे. तर, 2 टक्के प्रकरणात मांजर आणि 1 टक्के प्रकरणात कोल्हा किंवा मूंगूसामुळे रॅबीज परसतो.

 रॅबीजची लक्षणं काय?

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, रॅबीजची लक्षणं काहीवेळा फार उशीराने लक्षात येतात. पण, तोपर्यंत उपचार कठीण होण्याची शक्यता असते."रॅबीजचा संसर्ग झाल्यानंतर एका आठवड्यापासून ते एक वर्षात लक्षणं दिसू लागतात."पण, सामान्यत: आजाराची लक्षणं 2-3 महिन्यातही दिसून येतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार-ताप आणि अंगदुखी होणं,व्हायरस सेंट्रल नर्व्हस सिस्टिममध्ये (चेतासंस्थेत) शिरल्यानंतर मेंदू आणि मणक्यात सूज येणं.फ्युरिअस रेबीजमध्ये रुग्णाचं वागणं बदलतं. रुग्ण हायपर होतो किंवा त्यांना पाण्याची भीती वाटू लागते.हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू होणं. पॅरेलॅटीक रेबीजमध्ये स्नायू हळूहळू कमकूवत होतात. रुग्ण कोमात जातो आणि त्यानंतर मृत्यू होतो."तात्काळ उपचार केले नाहीत तर 100 टक्के प्रकरणांमध्ये रुग्णाचा जीव जातो."

 प्राणी चावलेली जागा स्वच्छ कशी करावी?

रॅबीज व्हायरस प्राण्यांच्या लाळेतून माणसाच्या शरीरात प्रवेश करतो. त्यामुळे प्राणी चावल्यानंतर जखमेची जागा स्वच्छ करणं सर्वांत महत्त्वाचं आहे."प्राण्याने चावल्यानंतर जखमेवर योग्य उपचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे संसर्ग शरीरातील इतर भागात पसरण्यावर नियंत्रण मिळवता येतं. ज्यामुळे पुढील गुंतागुंत कमी होते.नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने (NCDC) प्राणी चावल्यामुळे झालेली जखम कशी स्वच्छ करावी यासाठी मार्गदर्शक सूचना पुढील प्रमाणे आहेत. प्राणी चावल्यामुळे जखम झालेल्या जागेवरची लाळ लवकरात लवकर स्वच्छ करावी. पाणी आणि साबणाने जखमेचा भाग 15 मिनिटं स्वच्छ धूवावा. जखम धुवून झाल्यानंतर त्यावर अॅन्टिसेप्टिक लावावं.

 साबण किंवा व्हायरसविरोधी पदार्थ (अल्कोहोल, प्रोव्हिडोन आयोडिन) उपलब्ध नसेल तर जखम पाण्याने धूवावी. जखमेत संसर्ग होऊ नये यासाठी टीटॅनसचं इंजेक्शन घ्यावं. कुत्रा चावलेल्या रुग्णाला मानसिक आधार द्यावा. तात्काळ डॉक्टर किंवा रुग्णालयात जाऊन वैद्यकीय मदत घ्यावी.

 प्राणी चावल्यामुळे झालेल्या जखमेवर हे लावू नका.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, साध्या हातांनी जखमेला स्पर्श करू नका, स्पर्श करण्याआधी हात स्वच्छ करावेत. जखमेवर माती, तेल, लिंबू, खडू, मिरची पावडर यांसारखे पदार्थ लावू नका. जखमेवर पट्टी बांधू नका.

डॉक्टरांकडे केव्हा जावं?

कुत्रा किंवा प्राणी चावल्यानंतर तात्काळ योग्य वैद्यकीय उपचार मिळाले तर रुग्णाचा जीव वाचवता येऊ शकतो. "कुत्रा किंवा मांजर चावल्यानंतर जखम झालेली जागा तात्काळ साबण आणि पाण्याने धूवून रुग्णालयात जावे.  सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे, रॅबीजवर नियंत्रण हा एकमेव पर्याय आहे. लोकांमध्ये रॅबीज या आजाराबाबत आणि वैद्यकीय उपचारांबाबत जनजागृती नसल्याने लोक उशीरा डॉक्टरांकडे उपचारांसाठी पोहोचतात. काही प्रकरणात रुग्णालयात उपचारांसाठी दाखल होईपर्यंत रुग्णाचा मृत्यू होतो. प्राणी चावल्यानंतर किंवा प्राण्याने अंगावर ओरखडा मारल्यानंतर तात्काळ डॉक्टरांकडे किंवा रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत. "प्राण्याने शरीरावर ओरखडा मारला असेल तर रुग्णाला तातडीने रॅबीजची लस दिली जाते. पण, जखमेतून रक्त येत असेल किंवा प्राण्यांच्या लाळेशी संपर्क झाला असेल तर लसीसोबत रॅबीज इम्युनोग्लोबिन देण्यात येतं. प्राणी चावल्यानंतर तात्काळ वैद्यकीय उपचार घेतल्यामुळे लक्षणांवर योग्य उपचार होतात आणि रोगाचा प्रसार नियंत्रणात ठेवता येतो."रॅबीज प्रतिबंधासाठी रॅबीजविरोधी लसीचे पाच डोस घ्यावे लागतात. प्राणी चावल्यानंतर त्याच दिवशी लस घ्यावी लागते. याला शून्य दिवस असं म्हटलं जातं. त्यानंतर तीन, सात, 14 आणि 28 व्या दिवशी रॅबीजविरोधी लस घ्यावी लागते. जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील प्राण्यांनी चावा घेतल्यानंतर अशाच पद्धतीने लसीकरणाबाबत माहिती दिली आहे.  प्राण्यांनाही अशाच पद्धतीने रॅबीजविरोधी लसीचे डोस देण्यात येतात.

 रॅबीजबद्दलचे चुकीचे समज-

रेबीजबाबत लोकांमध्ये जनजागृतीचा अभाव असण्यासोबतच गैरसमजही खूप आहेत.रॅबीजच्या उपचारात 14 दिवस सलग पोटात इंजेक्शन घ्यावं लागतं किंवा कुत्रा चावल्यानंतर झालेल्या जखमेवर हळद, हायड्रोजन-पेरॉक्साईड, औषधी वनस्पती, तूप लावल्याने संसर्गाच्या प्रसारावर नियंत्रण मिळवता येतं, असे काही गैरसमज लोकांमध्ये आहेत.

रॅबीजची लस कोणाला दिली जाते?

"घरातील कुत्रा, मांजर यांसारख्या पाळीव प्राण्यांना रेबीजविरोधी लस दिली जाते. त्याचसोबत पशूवैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी आणि प्राण्यांसोबत काम करणाऱ्यांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दिली जाते. रॅबीजविरोधी लसीचा अजिबात तुटवडा नाही. ग्रामीण भागातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात रॅबीजविरोधी लस उपलब्ध असते.

 रॅबीज झालेल्या प्राण्यांचं काय केलं जातं?

"कुत्र्यांमध्ये रॅबीजचा संसर्ग झाल्याची अनेक प्रकरणं पाहायला मिळतात. एखाद्या प्राण्याला रॅबीज असल्याचा संशय आला तर त्यांना मॉनिटर केलं जातं. या प्राण्यांना सरकारी रुग्णालयात किंवा प्राण्यांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये वेगळं ठेवलं जातं. प्राण्यांना रॅबीज होऊ नये यासाठी त्यांच नियमित लसीकरण महत्त्वाचं आहे. "प्राण्यांना पहिल्या वर्षी रॅबीजविरोधी लशीचे दोन डोस दिले जातात. त्यानंतर दरवर्षी एक डोस दिला जातो."