कसाल येथे उद्या दहावी, बारावी नंतरच्या अनोख्या करिअरबाबत मार्गदर्शनासाठी परिसंवाद.

कसाल येथे उद्या दहावी, बारावी नंतरच्या अनोख्या करिअरबाबत मार्गदर्शनासाठी परिसंवाद.

कुडाळ.

     कसाल येथील विद्यानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल या ठिकाणी ५ मे रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत विख्यात संशोधक आणि आईसर, पुणे येथील समन्वयक डॉ.अरविंद नातू,भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटरचे शास्त्रज्ञ डॉ.विवेक पारकर, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे डॉ.उदय दोंडे, प्रख्यात लेखक व नाट्यलेखक डॉ.प्रदीप ढवळ या तज्ज्ञांचे मार्गदर्शन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी व पालक यांच्यासाठी आयोजित करण्यात आले आहे.पुणे येथील आईसर ही विज्ञान शिक्षण व संशोधन क्षेत्रातील भारतातील अग्रगण्य संस्था आहे. डॉ. नातू या संस्थेच्या स्थापनेपासून संलग्न आहेत. करिअरमध्ये मूलभूत संशोधनाचे महत्त्व व ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थीही आईसरचा लाभ कसा घेऊ शकतात, तेथील प्रवेश प्रक्रिया यावर डॉ. नातू मार्गदर्शन करणार आहेत.भाभा ॲटोमिक्स सेंटर या ठिकाणी असलेल्या विविध संधी, शिष्यवृत्ती त्यासाठीच्या परीक्षांची करायची तयारी यावर डॉ.विवेक पारकर मुलांशी संवाद साधतील. मेडिसिन फील्डमध्ये असलेल्या विविध संधींसंदर्भात डॉ.उदय दोंडे मुलांना वपालकांना मार्गदर्शन करतील.कला, लेखन, पत्रकारिता यामधील संधीसंदर्भात डॉ.प्रदीप ढवळ मुलांशी संवाद साधतील, तसेच दहावी, बारावीनंतर करिअरचा मार्ग निवडताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा, विद्यार्थ्यांनी आपले करिअर निवडताना काळाचे भान ठेवून निवड करावी.
   आज सर्व क्षेत्रात संधी आहेत.त्या संधींचा शोध प्रत्येक विद्यार्थ्याने घेतला पाहिजे.अकरावी, बारावीतील अभ्यासक्रम त्यानंतर विविध क्षेत्रांत असणाऱ्या करिअरच्या संधी त्यांची निवडक उदाहरणे व प्रवेश पद्धती याचेही मार्गदर्शन मुलांना मिळणार आहे.आपल्या पाल्याचे संशोधन क्षेत्रातील करिअर घडविण्याच्या दृष्टीने जिज्ञासू पालकांना ही एक सुवर्णसंधी आहे. डॉ. अरविंद नातू यांना संशोधक म्हणून अनेक पुरस्कार व जीवनगौरव पुरस्काराने ही सन्मानित करण्यात आले आहे. आतापर्यंत त्यांनी देशभरात अनेक व्याख्यानांद्वारे विद्यार्थ्यांचे प्रबोधन केलेले आहे.सिंधुदुर्गातही त्यांची आतापर्यंत १९ व्याख्याने झाली आहेत.त्याचा फायदा म्हणजे सिंधुदुर्गातील पंधरा विद्यार्थी आईसर या नामांकित संस्थेत उच्चशिक्षण घेत आहेत. दहावी, बारावीनंतर उच्चशिक्षणासाठी मुलांसाठी अनेक स्कॉलरशिप असून मार्गदर्शनाअभावी मुलांना त्याचा लाभ घेता येत नाही.याचे योग्य मार्गदर्शन मिळाल्यास गुणवंत विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊन शैक्षणिक क्षेत्रात उद्भवणाऱ्या आर्थिक स्थितीवर मात करता येईल.