पहलगाम येथील भ्याड हल्ल्याचा शिरोडा येथे काँगेसतर्फे निषेध

पहलगाम येथील भ्याड हल्ल्याचा शिरोडा येथे काँगेसतर्फे निषेध

 

वेंगुर्ला


  पहलगाम येथे पर्यटनासाठी आलेल्या निष्पाप भारतीयांचा बळी घेणाऱ्या अतिरेक्यांना पोसणाऱ्या आणि त्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून आणि पाकिस्तान विरोधी घोषणा देऊन काँग्रेसतर्फे शिरोडा येथे निषेध करण्यात आला. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख म्हणाले की अतिरेक्यांनी 28 निष्पाप नागरिकांचा बळी घेऊन त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आयुष्य उध्वस्त केले आहे. हा भारताच्या सार्वभौमत्वावर हल्ला आहे. अतिरेक्यांना पोसणाऱ्या आणि त्यांना हे कृत्य करायला लावणाऱ्या पाकिस्तानचा कायमचा बंदोबस्त सरकारने करावा. देशातील 140 कोटी जनता यासाठी सरकारच्या पाठीशी आहे. श्रद्धांजली वाहताना इर्शाद शेख म्हणाले ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती परमेश्वर देवो. वेंगुर्ला तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष प्रथमेश उर्फ बंड्या परब म्हणाले आज पर्यंत पाकिस्तानने अनेकवेळा भारताच्या भूमीवर अतिरेकी हल्ले घडवून आणले आता या नापाक पाकिस्तानला पुन्हा भारताच्या भूमीवर असे भ्याड हल्ले करण्याची हिंमत होणार नाही असा धडा भारत सरकारने शिकवावा.वेंगुर्ला तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष कृष्णा आचरेकर म्हणाले आता भारतीयांची सहनशक्ती संपली आहे आता भारत सरकारने पाकिस्तानचा नकाशा बदलून टाकण्याची वेळ आली आहे. यावेळी महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी मेणबत्त्या पेटवून हल्ल्यात जीव गमवलेल्या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख, वेंगुर्ला युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रथमेश उर्फ बंड्या परब, वेंगुर्ला तालुका काँग्रेस उपाध्यक्ष कृष्णा आचरेकर, रेडी जि.प. विभागीय अध्यक्ष अभिजीत राणे, शिरोडा काँग्रेस अध्यक्ष जगन्नाथ गावडे, निलेश मयेकर, कौशिक पांडुरंग परब, बाळा जाधव, पंकज मसूरकर, राम परब, ओम परब, श्रवण गावडे, विकास कावळे, शिवसेना शाखा प्रमुख राकेश परब, वेंगुर्ला युवासेना उपतालुका प्रमुख रोहित पडवळ, शेखर झाटिये, विराज राऊत इत्यादी उपस्थित होते.