सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालय बंद पाडण्याचा डाव - माजी खासदार विनायक राऊत

सिंधुदुर्गनगरी
सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची मिळून 146 हुन अधिक पदे रिक्त आहेत. यामुळे महाविद्यालयाची सेवा कोलमडली असून शैक्षणिक दर्जावरही त्याचा परिणाम होत आहे. हा प्रकार म्हणजे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी व नागरिकांच्या जीवनाशी खेळण्याचा आहे. याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीही गंभीर नाहीत, असा आरोप माजी खा. विनायक राऊत यांनी केला. येत्या महिन्याभरात यात सुधारणा न झाल्यास उबाठा शिवसेनेच्या वतीने तीव्र लढा उभारू, असा इशारा त्यांनी दिला आहे.विनायक राऊत व ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्गनगरी येथे सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामकाजाचा आणि विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शैक्षणिक सुविधांचा आढावा अधिष्ठात डॉ.अनंत दंवंगे यांच्याशी चर्चा करून घेतला. जि. प. माजी अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, युवासेना जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक, शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष जान्हवी सावंत, जिल्हा महिला संघटक श्रेया परब, जयभारत पालव आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.विनायक राऊत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोरगरीब जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महत्वाचे आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पूर्ण तरतुदीनिशी हे महाविद्यालय मंजूर करण्यात आले. मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावरूणन जाताच महायुती सरकारने या तरतूद आणि तयार केलेला प्लॅन आराखडा बदलण्याचा प्रयत्न केला. परंतु ते शक्य झाले नाही कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी यासाठी मान्यता देताना महाविद्यालयाला पूर्ण तरतूद करत सकारात्मक भूमिका घेतली होती. आज या महाविद्यालयात चौथ्या वर्षाची बॅच सुरू आहे. पुढील वर्षी 100 डॉक्टर या महाविद्यालयातून बाहेर पडणार आहेत. राज्यात लक्षवेधी आणि एक उत्तम दर्जाचे वैद्यकीय महाविद्यालय उभे करण्याचा आमचा मानस होता. दरम्यान, गेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील जनतेने जिल्ह्याची संपूर्ण सत्ता भाजप व शिंदे शिवसेनेच्या हाती दिली. तरीही या वैद्यकीय महाविद्यालयाकडे सत्ताधारी खासदार, आमदार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राऊत यांनी केला. हे वैद्यकीय महाविद्यालय बंद पाडून आपले खासगी वैद्यकीय महाविद्यालय चालावे या दृष्टीनेच त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, सत्तेचा दुरुपयोग करून ते सिंधुदुर्ग शासकीय महाविद्यालय बंद पाडण्याचा कुटील प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.या वैद्यकीय महाविद्यालयासाठी 22 प्राध्यापक मंजूर असताना केवळ तीन प्राध्यापक कार्यरत आहेत. सहयोगी प्राध्यापक 26 मंजूर असून केवळ 7 प्राध्यापक सेवेत आहेत. तर वरिष्ठ निवासी डॉक्टर्सची 81 मंजूर असून त्यातील 19 पदे रिक्त आहेत, अशी माहिती राऊत यांनी दिली. अश्या प्रकारे प्राध्यापकांची पदे रिक्त असल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जावर होत आहे. यातून हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बंद पाडण्याचा घाट सत्ताधाऱ्यांचा असल्याचा आरोप राऊत यांनी केला. प्राध्यापकांप्रमाणेच लॅब टेक्निशियन व अन्य तज्ज्ञांची पदेही रिक्त आहेत. गेल्या चार वर्षात या महाविद्यालयाचा मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त झालेला नाही. अधिष्ठाता पदही प्रभारी आहे. याकडे सत्ताधारी दुर्लक्ष का करत आहेत? असा सवाल त्यांनी केला.शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणली. निवडणुकीच्या काळात आणलेल्या या योजनेचे त्यापूर्वी अनेक नियम, निकष तयार केले. परंतु निवडणुकीनंतर 'गरज सरो आणि वैद्य मरो' या म्हणी नुसार ही योजना बंद करण्याचा घाट सरकारचा आहे. मोठ्या प्रमाणात महिलांना या योजनेतून अपात्र केले जात आहे. सरकारने 2100 रु. देण्याचे जाहीर केले असले तरी पुढील आर्थिक वर्षात ही योजना सुरू राहील की नाही, हे सांगणे कठीण आहे. जि. प., पं. स. व महानगरपालिकांच्या निवडणुका आटोपताच ही योजना बंद होईल, असा दावा राऊत यांनी केला.