रत्नागिरी रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांना बसद्वारे मुंबईत सोडणार; प्रशासनाचा निर्णय.
रत्नागिरी.
कोकणात पावसाचे धुमशान सुरू आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवटी नातुवाडी बोगद्याजवळ माती आणि झाडे ट्रॅकवर कोसळल्याने कोकण मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या मार्गावरील अनेक गाड्या या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या माघारी पाठवण्यात येणार आहे. तर काही गाड्यांचे मार्ग बदलले जाणार आहे. दरम्यान, रत्नागिरी स्थानकावर कालपासून काही गाड्या थांबल्या आहेत. या गाड्यांत मोठ्या प्रमाणात प्रवासी असून त्यांना आता बसने मुंबईला सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
गेल्या दोन दिवसापासून कोकणाला मुसळधार पावसाने झोडपले आहे. या पवसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवटी नातुवाडी बोगद्याजवळ माती आणि झाडे ट्रॅकवर कोसळल्याने कोकण मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. रेल्वे मार्गावरील दरड दूर करण्याचे काम सुरू आहे. मात्र, काल रात्री पासून अनेक प्रवासी या मार्गावर अडकून पडले आहेत. त्यांना खायला आणि प्यायला देखील मिळालेले असल्याने त्यांचे हाल झाले आहे. यात लहान मुळे आणि वृद्ध व्यक्तीची संख्या मोठी आहेत.
रत्नागिरी स्थानकावर काही रेल्वे गाड्या थांबून ठेवण्यात आल्या होत्या. या गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी अडकून पडले आहेत. अनेक प्रवाशांनी कोकण रेल्वेच्या कारभारावर टीका देखील केली. तसेच या मार्गावरची वाहतूक ही कधी सुरळीत होईल या बाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तब्बल १५ ते १६ तास प्रवासी एकाच स्थानकावर अडकून पडले आहेत. त्यामुळे त्यांच्या बाबतीत प्रशासाने मोठा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी रेल्वेस्थानकावर अडकलेल्या प्रवाशांना बसद्वारे मुंबईत सोडलं जाणार आहे. रत्नागिरी- कोकण रेल्वे ठप्प झाल्यामुळे या ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटीची व्यवस्था केली जाणार आहे. येथील विविध स्थानकावरुन अडकलेल्या प्रवाशांना एसटी बसने मुंबईला सोडले जाणार आहे. या साठी रत्नागिरी स्थानकावरून २५ बस सोडल्या जाणार आहेत.