अरबी समुद्रात उंच लाटा उसळणार; भारतीय हवामान विभागाचा अंदाज.

अरबी समुद्रात उंच लाटा उसळणार; भारतीय हवामान विभागाचा अंदाज.

मुंबई.

   येत्या ३६ तासांच्या कालावधीत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता भारतीय हवामानशास्र विभाग आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इनफॉर्मेशन सर्व्हीसने वर्तवली आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी समुद्रात जाणे टाळावे तसेच संबंधित असणाऱ्या यंत्रणांना सहकार्य करावे असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे.
   भारतीय हवामानशास्र विभाग आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इनफॉर्मेशन सर्व्हीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज शनिवार ४ मे रोजी सकाळी ११.३० वाजल्यापासून ते रविवार दिनांक ५ मे २०२४ रोजी रात्री ११.३० वाजेपर्यंत. या ३६ तासांच्या कालावधीत समुद्रात भरतीच्या वेळी अधिक उंच लाटा उसळण्याची शक्यता वर्तवली आहे. मिळालेला इशारा लक्षात घेता समुद्र किनारपट्टीच्या आसपासच्या परिसरात तसेच सखल भागांमध्ये या लाटांचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली आहे. साधारणपणे समुद्रात भरतीच्या कालावधीत लाटांच्या उंचीत सरासरी ०.५ ते १.५ मीटर इतकी वाढ होण्याची शक्यता आहे.
   अधिक उंचीच्या लाटा उसळण्याचा हा इशारा लक्षात घेता, बृहन्मुंबई महानगरपालिकेने या गोष्टीकडे गंभीररित्या लक्ष दिले आहे, याच पाश्वभूमिवर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी महानगरपालिकेच्या सर्व सहायक आयुक्त यांना पोलिसांसोबत समन्वय साधण्याचे आवाहनही केले आहे. उन्हाळी सुटीच्या निमित्ताने समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची संख्या जास्त दिसून येते. त्यामुळे अतिरिक्त खबरदारी म्हणून महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक आणि जीवरक्षक यांच्या मदतीने नागरिकांना समुद्रात जाण्यापासून मज्जाव करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.