बाल वयातच मुलांना साहित्य वाचण्याची आवड निर्माण करणे गरजेचे : कवी अजय कांडर.

बाल वयातच मुलांना साहित्य वाचण्याची आवड निर्माण करणे गरजेचे : कवी अजय कांडर.

कणकवली.

   शालेय जीवनात मुलांचा बौद्धिक विकास होणे महत्त्वाचे असते. यासाठी बाल वयातच मुलांना साहित्य वाचण्याची आवड निर्माण करणे गरजेचे आहे.राजे प्रतिष्ठान सिंधू आणि ओसरगांव शाळा नंबर १ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या एक दिवशीय बालकुमार साहित्य कला संमेलनातून मुलांना वाचनाची आवड निर्माण होईल. आणि भविष्यात याच मुलांमधून उद्या एखादा साहित्यिक कलावंत निर्माण होईल. त्यामुळे या संमेलनाचे मोल महत्वाचे आहे.यासाठी हे संमेलन आयोजित करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच असे प्रतिपादन नामवंत कवी अजय कांडर यांनी ओसरगांव येथे आयोजित केलेल्या एकदिवशीय बालकुमार साहित्य कला संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना केले.
   ओसरगांव शाळा नंबर १ च्या पटांगणावर राजे प्रतिष्ठान सिंधू आणि ओसरगांव शाळा नंबर १तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाचे उद्घघाटन जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्गचे प्राचार्य सुशीलकुमार शिवलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना कवी कांडर यांनी अशा संमेलना मधून मुलांची भाषिक समज लहानपणीच वाढते यासाठी अशी संमेलने वारंवार आयोजित केली जायला हवीत असेही आग्रहाने सांगितले.
   यावेळी मंचावर तालुका गटशिक्षण अधिकारी किशोर गवस, संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा मुख्याध्यापक किशोर कदम,रंगकर्मी कल्पना बांदेकर, राजे प्रतिष्ठान सिंधूचे अध्यक्ष विवेक परब, ओसरगाव सरपंच सुप्रिया कदम, निपुण भारतचे प्रमोद तांबे, केंद्रप्रमुख सुरेश हरकुळकर, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष जिवबा अपराज, बोर्डवे सरपंच  वेदांची पाताडे, आदी उपस्थित होते.