बांधकाम कामगारांना मिळणार अत्यावश्यक संच

कुडाळ
इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांच्या कल्याणासाठी महायुती सरकारने पात्र नोंदीत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच वितरण योजनेस मान्यता दिली आहे. या संचाचे वितरण लवकरच केले जाईल, अशी माहिती श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी दिली.या अत्यावश्यक संचामध्ये कामगारांना दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरतील अशा वस्तूंचा समावेश आहे. यात पत्र्याची पेटी, प्लास्टिकची चटई, २५ किलो क्षमतेची धान्य साठवण कोठी, २२ किलो क्षमतेची दुसरी धान्य साठवण कोठी, बेडशीट, चादर, ब्लँकेट, १ किलो क्षमतेचा साखरेचा डबा, ५०० ग्रॅम क्षमतेचा चहा पावडरचा डबा आणि १८ लिटर क्षमतेचा वॉटर प्युरिफायर या वस्तूंचा समावेश आहे. लवकरच या संदर्भात शासन स्तरावर निविदा प्रक्रिया राबवून कामगारांना लाभ देण्याचे धोरण आखण्यात आले आहे. प्रभारी कामगार उपायुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त आणि सरकारी कामगार अधिकारी यांनी प्रमाणित केलेल्या पात्र यादीनुसारच या संचांचे वितरण केले जाईल. याशिवाय नव्याने नोंदणी झालेल्या कामगारांना सुरक्षा संच वितरणास देखील कामगार विभागाने मान्यता दिली आहे. ज्याचे वितरण लवकरच सुरू होईल.