गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान मंजुर......भाजपा किसान मोर्चाने मानले पालकमंत्र्यांचे आभार

सिंधुदुर्ग
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत दुर्दैवी घटनेत बळीराजाचा मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबाला नियमानुसार मदत दिली जाते. सन २०२३ - २४ या वर्षांपासून संपूर्ण राज्यात राज्य शासनाच्या प्रशासकीय यंत्रणेमार्फत सदर योजना राबविण्यात येते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदानाचे प्रस्ताव सन २०२३ पासुन निधी अभावी मंजुर झालेले असताना सुद्धा आर्थिक तरतूद झाली नव्हती. ही समस्या ज्यावेळी भाजपा किसान मोर्चाच्या निदर्शनास आली त्यावेळेपासुन म्हणजे गेली दिड ते दोन वर्षे याचा पाठपुरावा कृषी विभागाशी सातत्यपूर्ण चालु होता. महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन होऊन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी व नितेश राणे कॅबिनेट मंत्री व सिंधुदुर्ग चे पालकमंत्री झाल्यावर पुन्हा एकदा या योजनेंतर्गत अनुदान मंजुर व्हावे यासंदर्भात भाजपा किसान मोर्चाने पाठपुरावा सुरु ठेवला होता. त्या पाठपुराव्याला यश येऊन दिनांक १७ जुन २०२५ ला निधी वितरणाचा आदेश कोकण विभागीय कृषी सहसंचालक, बालाजी ताटे यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना निर्गमित केला. सदरचा निधी वितरणाचा आदेश मिळाल्यावर भाजपा किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची जिल्हा कार्यालयात भेट घेऊन सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी भाजपा किमान मोर्चाचे जिल्हा संयोजक उमेश सावंत, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा किसान मोर्चा प्रभारी प्रसन्ना उर्फ बाळु देसाई, किसान मोर्चाचे जिल्हासरचिटणीस गुरुनाथ पाटील, महेश संसारे, ज्योती देसाई, ओरस मंडलाचे महादेव सावंत, बापु पंडीत, दामोदर नारकर, समर्थ राणे उपस्थित होते.