मान्सून दोन-तीन दिवसात राज्य व्यापणार; पुढील काही दिवस पावसाची शक्यता. हवामान विभागाचा यलो व ऑरेंज अलर्ट जारी.

मान्सून दोन-तीन दिवसात राज्य व्यापणार; पुढील काही दिवस पावसाची शक्यता.  हवामान विभागाचा यलो व ऑरेंज अलर्ट जारी.

पुणे.

   राज्यात नैऋत्य मौसमी वारे (मान्सून) दाखल झाले आहेत. दरम्यान, राज्यात हा पाऊस येत असतांना बहुतांश ठिकाणी पूर्व मौसमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात विदर्भ, मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रात पुढील चार दिवस जोरदार पाऊस व वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना हवमान विभागाने यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुणे, मुंबई, पालघर, नंदुरबार, धुळे, ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
   हवामान विभागाच्या पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, ६ जून रोजी नैऋत्य मौसमी पावसाने मध्य अरबी समुद्र कर्नाटकचा बहुतांश भाग, महाराष्ट्र तेलंगणा आंध्र किनारपट्टीचा काही भाग, तसेच पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात बहुतांश भाग, तर वायव्य बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग व्यापला आहे. येत्या तीन-चार दिवसात मॉन्सून हा मध्यवर्गी समुद्राचा आणखी काही भाग, कर्नाटक आंध्र किनारपट्टीचा उर्वरित भाग, मुंबईसह महाराष्ट्राचा आणि तेलंगणाचा आणखी काही भाग, छत्तीसगड आणि दक्षिण ओडिसाचा काही भाग, पश्चिम मध्य बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग तर वायव्य बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग व्यापण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.
    विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर कोकण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे उद्या संपूर्ण राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ८ तारखेला विदर्भात काही ठिकाणी तर उर्वरित राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ९ व १० जूनला कोकण विभागात तर दहा तारखेला मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात नऊ व दहाला तर विदर्भात नऊ जूनला काही ठिकाणी आणि १० जूनला विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
   आजपासून पुढील तीन दिवस आज पालघर नंदुरबार धुळे व जळगाव जिल्हा वगळता तर उद्या नंदुरबार जिल्हा वगळता संपूर्ण राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी ४० ते ५० किलोमीटर प्रतितास वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असून त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. ९  व १० रोजी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाट विभागात जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्र व पूर्व मराठवाड्यातील जिल्हे वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. म्हणून या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.