मोबाईल ऐवजी विविध पर्यायातून मुलांना आनंदाच्या झऱ्यापर्यंत न्यावे : वैशाली पंडित.

मोबाईल ऐवजी विविध पर्यायातून मुलांना आनंदाच्या झऱ्यापर्यंत न्यावे : वैशाली पंडित.

मालवण.

   आज लहान मुलांचा जास्त वेळ मोबाईल मध्येच व्यतीत होत असतो. अशावेळी त्यांचा मोबाईल बघण्याचा म्हणजेच मोबाईल स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी पालकांनीच पुढाकार घेऊन मोबाईलला पर्याय म्हणून आनंद देणाऱ्या इतर गोष्टी मुलांसमोर उपलब्ध केल्या पाहिजेत, तरच मुलांमधील नैसर्गिक आनंद, कल्पनाशक्ती व सृजनशिलता वाढीस लागेल. मोबाईल ऐवजी विविध पर्यायातून मुलांना आनंदाच्या झऱ्यापर्यंत न्यावे असे प्रतिपादन मालवण मधील ज्येष्ठ साहित्यिका वैशाली पंडित यांनी येथे बोलताना केले.
   मालवण येथील टोपीवाला हायस्कुल मधील काळे आजींची शिशुविहार बालवाडी मध्ये जिजामाता मंडळाच्या वतीने आयोजित पालकांशी संवाद कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिका वैशाली पंडित यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिजामाता मंडळाच्या उपाध्यक्ष सौ. मालती काळे, खजिनदार श्रीधर काळे, सचिव व बालवाडीच्या मुख्यशिक्षिका सौ. संस्कृती बांदकर, शिक्षिका सौ. प्रज्ञा राणे, सौ. शर्वरी घाडी, सौ. शालन सावंत, निशा बिडये आदी तसेच पालक उपस्थित होते. यावेळी मालती काळे यांनी वैशाली पंडित यांचे स्वागत केले. प्रास्ताविक व मान्यवर परिचय श्रीधर काळे यांनी केला.
   यावेळी मार्गदर्शन करताना वैशाली पंडित म्हणाल्या, आज आपण लहान मुलांना जे जे मागतील ते देत असतो. सर्व मिळत असले तरी काहीतरी केल्याने आपल्याला हवे ते मिळविण्या मधील आनंद व समाधान यापासून मुले वंचित राहत आहेत. मोबाईलवर गेम खेळण्यात, व्हिडीओ बघण्यात मुलांचा जास्त वेळ जात आहे. मात्र, इतरही छोट्या छोट्या गोष्टीत असणारा आनंद पालकांनी मुलांना दाखवून दिला पाहिजे. हा आनंद मिळवून देण्यासाठी मुलांचा मोबाईल वरील वेळ कमी करणे गरजेचे आहे. मात्र त्यासाठी मोबाईल न देण्याचा, मोबाईल काढून घेण्याचा अथवा मारणे व दमदाटी करण्याचा प्रकार क नये. मोबाईल मधून मिळणाऱ्या चांगल्या गोष्टीही आवश्यक आहेतच. मात्र मुलांना आनंदी ठेवण्यासाठी मोबाईल ऐवजी काय पर्याय देता येईल, याचा पालकांनी विचार करून तो अंमलात आणावा, असेही श्रीमती पंडित म्हणाल्या.
   तसेच या अनुषंगाने मुलांचा मोबाईल स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी पालकांनी मुलांना मोबाईल ऐवजी आनंदाचे इतर पर्याय उपलब्ध देण्याबाबत आठवडाभराची स्पर्धा यावेळी वैशाली पंडित यांनी जाहीर केली. या स्पर्धेद्वारे प्रत्येक पालक कोणकोणते पर्याय व कल्पना राबवतात, याचे निरीक्षण करण्यात येणार आहे. शेवटी संस्कृती बांदकर यांनी आभार मानले.