वायरी भूतनाथ किनाऱ्यावर ९५ कासव पिल्लांचा जन्म

वायरी भूतनाथ किनाऱ्यावर ९५ कासव पिल्लांचा जन्म

 

मालवण

 

    तालुक्यातील वायरी भूतनाथ समुद्र किनाऱ्यावर निसर्ग संवर्धनाचा एक सुखद सोहळा नुकताच पार पडला. १७ फेब्रुवारी रोजी सुरक्षितरीत्या जतन करण्यात आलेल्या अंडी उबवणी केंद्रातून तब्बल ५२ दिवसांच्या कालावधीनंतर ऑलिव्ह रिडले प्रजातीची ९५ पिल्ले सुखरूप बाहेर पडली. या चिमुकल्या पाहुण्यांना कासव मित्र आणि वनविभागाच्या मदतीने रात्रीच्या वेळी त्यांच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजेच समुद्रात सोडण्यात आले. १७ फेब्रुवारी रोजी स्थानिक रहिवासी लतिका प्रशांत पाटकर यांना समुद्र किनाऱ्यावर एक कासव अंडी घालण्यासाठी आल्याचे निदर्शनास आले होते. त्यांनी प्रसंगावधान राखत त्वरित 'युथ बीट्स फॉर क्लायमेट' या संस्थेला कळवले. संस्थेच्या सदस्यांनी पाहणी केली असता ते कासव दुर्मिळ 'ऑलीव्ह रिडले' प्रजातीचे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर कांदळवन विभागाला पाचारण करण्यात आले आणि बीच मॅनेजरमार्फत तिथून ११४ अंडी रेस्क्यू करण्यात आली. अंड्यांच्या सुरक्षिततेसाठी कांदळवन कक्ष दक्षिण कोकण (वनपरिक्षेत्र मालवण) यांच्या मार्गदर्शनाखाली वायरी भूतनाथ येथील कासव अंडी उबवणी केंद्रामध्ये ही अंडी स्थलांतरित करण्यात आली होती. गेल्या ५२ दिवसांपासून या केंद्रात अंड्यांची विशेष देखभाल घेतली जात होती. या मोहिमेत कासव मित्र गणेश माडये, रसिका माडये, युगा माडये, संजू भगत, अमर मातोंडकर, विनय मातोंडकर आणि सौरभ मातोंडकर यांनी सक्रिय सहभाग नोंदवत पिल्लांना समुद्राचा रस्ता दाखवला. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे आणि वनविभागाच्या नियोजनामुळे समुद्री जैवविविधतेच्या संवर्धनास मोठे यश मिळाले आहे.