वेंगुर्ल्याचा रक्षणकर्ता श्री देव मानसीश्वर

वेंगुर्ला
श्री देव मानसीश्वर वेंगुर्ले जत्रा म्हटली की, लाउड स्पीकरचे सूर, विद्युत रोषणाईचा झगमगाट आणि गर्दी हे चित्र अपेक्षित आहे. परंतु वेंगुर्ले येथील मानसीश्वराच्या स्थानावर भाविकांचा महापूर असतो, पण कानठळ्या बसणारे आवाज नसतात आणि डोळे टिपून टाकणारी रोषणाई केली जात नाही.या ठिकाणी फडकणारी असंख्य भगवी निशाण लक्ष वेधून घेतात. मंद सुवासासह कमळांची दाटीवाटी पाहायला मिळते आणि नकळतच ‘वाहऽऽ फारच सुंदर’ अशी दाद देऊन हात जोडले जातात.हे स्थान आहे श्री देव मानसीच्या देवचाराचे. याला मानसीश्वर असही म्हणतात. श्री देव मानसीश्वराचे देवस्थान हे सिंधुदुर्गातील एक महत्वपूर्ण पर्यटनस्थळ आहे. कुडाळ - वेंगुर्ले रस्त्यावर वेंगुर्ले शहराची हद्द संपताच खाडीचे दोन प्रवाह लागतात. त्यापैकी दुस-या पुलापाशी पूर्वेकडे नदीतच मानसीश्वराचे देवस्थान आपणास दिसते. नेहमीप्रमाणे मंदिर, गाभारा, मूर्ती असे काहीही याठिकाणी दिसत नाही. १५ फुटाचे चौरस बंधा-याप्रमाणे बांधकाम आणि त्यावर रोवलेली असंख्य भगवी निशाणे दृष्टीस पडतात.बाकी केवळ आजूबाजूला झाडी आणि पाणी आहे.
या देवस्थानाबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की, हे देवस्थान मुळचे मालवणचे. त्याहीपूर्वी ते घाटावर असल्याचे सांगण्यात येते. तेथून ते वाहत मालवण तालुक्यातील गोळवण या गावी आले. गावच्या सीमेवरील आंब्याच्या झाडावर राहून येणा-या जाणा-या सर्व देवदेवतांना आपल्या दोन्ही पायांच्यामधून जाण्यास भाग पाडत असे.हे जेव्हा वेंगुर्ले पंचायतनाला समजले, तेव्हा ते महोदय पर्वणीच्या निमित्ताने समुद्रस्नान करण्यासाठी मुद्दाम मालवण समुद्र किना-यावर गेले. रवळनाथ, सातेरी, रामेश्वर, भूतनाथ, भराडीदेवी इत्यादी शक्तींनी गोळवणचे हे देवस्थान वेंगुर्ले येथे आणले आणि श्री रवळनाथ मंदिराजवळ आंब्याच्या झाडावर ठेवले. हे देवस्थान शंकराचा अवतार शिवगणांपैकी असल्याने त्याच्यासोबत चाळा आहे. त्याचा परिसरातील लोकांना त्रास झाल्यामुळे श्री रवळनाथाने हे देवस्थान कॅम्प येथे ठेवले. तेथेही लोकांच्या बाजारातून आणलेल्या पिशवीतील धान्य, भाज्या इत्यादी अचानक नाहीसे होणे इ. त्रास होऊ लागले. रवळनाथ, रामेश्वर पंचायतनाने या देवस्थानास विचारले तेव्हा त्याने पाणी असलेल्या जागेत स्थापना करावी, असे सांगितले. त्यामुळे त्याची उभादांडा मानसी पुलाजवळ स्थापना झाली. ते पुढे मानसीश्वर या नावाने प्रसिद्ध झाले.या ठिकाणाहून जाताना कोणत्याही प्रकारचे वाद्य न वाजवता जाणे हे या ठिकाणाचे वैशिष्टय आहे. गावातील ख्रिश्चन लोकही या प्रथेचे पालन करतात. निसर्गरम्य वातावरणातील व समुद्राच्या पाण्यानजीक असलेल्या या देवतेच्या नजीकच्या पुलावरून सोमवती तसेच अमावस्येच्या महोदय पर्वणी तीर्थस्नानात तालुक्याबरोबरच अन्य तालुक्यातील देवदेवता, तरंग देवता व रयत सागरेश्वर किनारी जातात. मात्र वेंगुर्ले येथील ग्रामदैवत रामेश्वर मात्र अन्य मार्गाने सागरेश्वर येथे जातो. याची आख्यायिका अशी सांगितली जाते की, अशा एका पहिल्याच अभ्यंगस्नानाच्या महोदय पर्वणीस जाताना मानसी पुलावर या देवाने आपले अक्राळविक्राळ स्वरूप प्रकट करून तो पाय पसरून उभा राहिला.आपल्या पायाखालून सर्वांनी जावे असा त्याचा आग्रह होता. हा आग्रह सशर्तपणे सर्वच देवतांनी पाळला. मात्र इतर देवतांप्रमाणे श्री देव रवळनाथ आणि श्री देव रामेश्वर हे देव समुद्राकडे जात असताना त्यांनाही मानसीश्वराने अडविले. आणि त्यानाही आपल्या पायाखालून जाण्यास सांगितले.वेंगुर्ल्याच्या ग्रामदेवतेस तो अपमान वाटला. त्याने मानसीश्वरास तू पाय बाजूला कर मी स्नानास जाऊन येतो व येताना तुझ्यासाठी अदभूतरम्य असा दहा पायांचा अश्व (घोडा) भेट देतो, असे सांगताच मानसीश्वराने एक पाय बाजूला घेताच वेंगुर्लेचे ग्रामदैवत सागरेश्वर किनारी स्नानास गेले. आपल्याला ह्या ग्रामदेवतेकडून असे अदभूत काहीतरी मिळणार यामुळे मानसीश्वर खुश होते. पुनश्च सर्व देव स्नान करून परत आले.यापैकी कुणालाच त्याने अडविले नाही कारण रामेश्वराची स्वारी यायची होती.त्याबरोबरच वेंगुर्लेचे ग्रामदैवतही आले. आता आपल्याला ते अदभूत वाहन मिळणार, आणि ते सुद्धा दहा पायाचे या खुशीत मानसीश्वराने परत जाणा-या वेंगुर्ल्याच्या ग्रामदेवतेस जातेवेळी केलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली. त्यावेळी समुद्र किना-यावरून आणलेली एक ‘कुर्ली’ (खेकडा) मानसीश्वरास देऊन हा घे तुझा वारू (घोडा). त्याला दहा पाय आहेत की नाही बघ! हे तुझे वाहन.. ’ असे सांगून रामेश्वर पुढे निघाला. त्यावेळी मानसीश्वर संतापले. मला फसवलेस काय, आता यापुढे तु येथून जावू शकणार नाहीस. ‘जायचच असेल तर माझ्या पायाखालून जा’ असे सांगितले. तेव्हापासून आजपर्यंत वेंगुर्लेचे ग्रामदैवत फक्त परबवाडा मार्गे सागरेश्वर किनारी समुद्रस्नानास जाते. मात्र बाकी सर्व गावच्या देवदेवता या मानसी पुलावरूनच वाद्ये न वाजविता जातात. यानंतर सर्वजण ‘न जाणो आपल्यालाही तो अडवू शकतो’, या भावनेन मानसीश्वराच्या स्थानावरून जाताना इतर सर्व गावच्या देवदेवतांच्या पालख्याही वाद्य न वाजवता जातात. वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वराची पालखी वाजत-गाजत जात असताना, या भागातून जाताना मात्र अत्यंत शांततेन पुढे सरकते. जेणेकरून मानसीश्वराला आपण जात आहोत, याचा थांगपत्ता लागू नये, असा प्रयत्न असतो.मात्र शांततेची प्रथा आजही संपलेली नाही. येथे पोहोचल्यावर स्थानिक ग्रामस्थ आवाज न करता शांतता बाळगण्याची सूचना करतात. येथे कुणीही हॉर्न वाजवत नाहीत, उलट या भागातून जाताना आपल्या गाडीचा आवाज कमीत कमी येईल,याची दक्षता घेतली जाते.लग्नाची वरात असो अथवा अन्य कोणताही उत्सव. या स्थानावरून जाताना सारे जण चिडीचूप होतात.अशा या जागृत देवस्थानच्या एकमेव वार्षिक जत्रोत्सव दरवर्षी 'माघ शुक्ल पक्ष अष्टमी'ला होतो. या देवस्थानच्या वार्षिक जत्रोत्सवाला ‘शिडाची जत्रा व बत्तीची जत्रा’ या नावाने संबोधले जाते. गॅसबत्ती रात्रभर पेटवून ठेवण्याचा नवस अनेक भक्त करतात. त्यामुळे एकाचवेळी शंभरच्या आसपास गॅसबत्त्या एकाच मांडवात पेटत असल्याचे पहावयास मिळते.या देवासाठी खासकरून चुरमु-याचे लाडू, शेंगदाणे, लाडू, केळी, नारळ, भगवी निशाण, पेट्रोमॅक्स बत्त्या,घंटी अशा स्वरूपाचे नवस भाविक लोक श्रद्धेने करतात. जत्रोत्सवादिवशी सुमारे ५ ते ६ हजार भगव्या निशाणीच्या पताका या देवस्थानाला भाविक लोक घालतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यावेळी बांबूच्या काठीस भगवा झेंडा लावलेले निशाण घेऊन प्रत्येकजण येतात आणि भगव्या निशाणांनी देवस्थान सजते व भगव्या निशाणांचे विलोभनीय दृश्य दिसते. दिवसभरात सुमारे १० सहस्त्रहून अधिक लोक या जत्रेला येतात. जिल्ह्यातील तसेच मुंबई, गोवा, बेळगाव आणि कोल्हापूर येथूनही भाविक येऊन त्यांचा नवस फेडतात.समुद्राच्या पाण्याचा वावर देवस्थानच्या सभोवताली असतो हे खास आकर्षण आहे.या जत्रेत कोकणातील प्रसिद्ध दशावताराचा खेळ हा पेट्रोमॅक्सच्या बत्तीच्या उजेडात सादर केला जातो.दिवाबत्तीच्या उजेडात सादर केला जाणारा दशावताराचा खेळ पाहण्याचा आनंद हा काही औरच! शांतता, नैसर्गिक सान्निध्य असलेल्या या देवस्थानात पर्यटकही काही काळ विश्रांती घेतात. देवाचे काही भाविक मंडळी या देवास जिवंत खेकडे नवस म्हणून प्रदान करतात. मानसीश्वर देवस्थान अत्यंत जागृत आहे. हा देव मुळचा ब्राम्हण असल्याचे सांगण्यात येते. त्याने रात्री-अपरात्री एकटया जाणा-या भक्तांना सोबत देऊन आपापल्या स्थानी सुरक्षित पोहोचविल्याचे अनेक लोकांचे अनुभव परिसरात आहेत. या देवाचे वर्णन पंचा,डोक्याला फेटा, उपरणे हातात कंदील आणि वयस्कर व्यक्तीसारखा आहे, असे सांगण्यात येते.