अमेरिकेतील डॅलस शहरात पार पडला 'बीएमएम टेक्सास मैत्री मेळावा'

अमेरिका
चांगले उद्दिष्ट्य मनात ठेवून राबवलेला उपक्रम अपेक्षेपेक्षा किती जास्त सकारात्मक परिणाम घडवून आणू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे अमेरिकेतील डॅलस शहरात पार पडलेला 'बीएमएम टेक्सास मैत्री मेळावा'. हा आगळावेगळा, भव्य मैत्री मेळावा साजरा करण्यासाठी डॅलस नगरी सज्ज झाली आणि या मैत्री मेळाव्याची दिमाखात सुरुवात झाली. टेक्सास आणि जवळच्या राज्यांमधून १५०० पेक्षा अधिक मराठी रसिक या कार्यक्रमास उपस्थित होते. भरजरी, रंगीबेरंगी पैठण्या, नऊवारी साड्या परिधान करून त्यावर अनुरूप दागिन्यांचा साज चढवून महिलांनी आपल्या उत्साहात या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. पुरुष व चिमुकलेही पारंपारिक वेशभूषेत या ठिकाणी आले होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष प्रसाद पानवळकर आणि त्यांची कार्यकारी समिती, फ्रीस्को शहराच्या कौन्सिल सदस्या लॉरा रूमल हे उद्घाटनासाठी आवर्जून उपस्थित होते. त्याचबरोबर ऑस्टिन, ह्युस्टन आणि सॅन अँटोनीओ महाराष्ट्र मंडळाचे प्रतिनिधीही हजर होते. भारतीय दूतावास महासंचालक डी. सी. मंजुनाथ यांनीदेखील हजर राहून या मेळाव्याची शोभा वाढवली. डॅलस फोर्ट वर्थ महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षा शामली असनारे यांनी हा "मैत्री मेळावा हा सर्व कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचा परिपाक आहे, हे प्रास्ताविकेत आवर्जून नमूद केले. या संपूर्ण दोन दिवसाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंयोजन सचिव राहुल पाडळीकर यांनी केले.मैत्री मेळाव्याची सुरुवात 'राजा शिवछत्रपती' या शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्याने झाली. डॅलसचे सुजीत साठे यांनी लिहिलेले शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'राजा शिवछत्रपती' है महानाट्य डॅलसच्या १२५ हून अधिक लहानमोठ्या कलाकारांनी दृक श्राव्य सादरीकरणाचा आणि प्रकाश योजनेचा प्रभावी उपयोग करीत सादर केले. साठेंच्या ओघवत्या आणि अभ्यासपूर्ण निवेदनाने उपस्थितांसमोर स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या मावळ्यांचा इतिहास जिवंत झाला.उपस्थित लहान मुलांच्या तोंडीदेखील 'जय भवानी जय शिवाजी' या घोषणा ऐकून डॅलस फोर्टवर्थ महाराष्ट्र मंडळाच्या परिश्रमांचे सांस्कृतिक पडसाद पुढच्या पिढीपर्यंत कसे नकळत पोहोचवले जात आहेत याची प्रचीती येते. या नाट्यातील अभूतपूर्व राज्याभिषेक सोहळ्यानंतर प्रचंड उत्साहात ढोल-ताशांच्या गजरात,गौरवयात्रेने या महानाट्याची सांगता झाली.मंडळाच्या सहखजिनदार रश्मी थोपटे यांनी माहिती दिली की, दोन दिवसाच्या मैत्री मेळाव्यात मनोरंजनाबरोबरच अनेक वैचारिक, समाजपयोगी आणि बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या उपक्रमांची रेलचेल होती. रेशीमगाठी ह्या विवाहोत्सुक तरुणांच्या पालकांसाठी असलेल्या कार्यक्रमाचा लाभ अनेक युवक-युवतींना मनपसंत जोडीदार निवडण्यास होईल, रियल इस्टेट कनेक्टमध्ये अमेरिकेतील रियल इस्टेट मधील संधींची ओळख करून देण्यात आली. बृहन्महाराष्ट्र मराठी शाळा संमेलन ह्या खास मुलांसाठी असलेल्या कार्यक्रमाचे सुंदर सादरीकरण झाले. मंडळाचे वेबमास्टर सचिन फुंदे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, बी-कनेक्ट या खास व्यावसायिकांसाठी आखलेल्या कार्यक्रमाला टेक्सासमधील मराठी उद्योजकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. टेक्सासमधील मराठी डॉक्टर्ससाठी खास चर्चासत्रही ह्या मेळाव्यात आयोजित केले होते. थ्री इडियट फेम ओमी वैद्य यांच्या स्टैंडअप कॉमेडीचा रसिकांनी मनमुराद आस्वाद घेतला. उत्तरंग हा खास ज्येष्ठांसाठी असलेल्या कार्यक्रमाचा ज्येष्ठांनी आस्वाद घेतला, स्थानिक कलाकारांच्या लघुनाट्य, नृत्यकथा आणि सांगीतिक जियोपार्डी ने कार्यक्रमाला वेगळीच रंगत आणली. मैत्री मेळाव्याच्या पहिल्या दिवसाची सांगता जर तर ची गोष्ट' या खास भारतातून आलेल्या नाटकाने झाली. प्रिया बापट, उमेश कामत, पल्लवी पाटील आणि आशुतोष गोखले यांच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.मंडळाचे खजिनदार संतोष देशमुख म्हणाले "१५०० पेक्षा अधिक रसिकांसाठी दोन्ही दिवस चहा, नाश्ता आणि जेवणाची उत्तम व्यवस्था हे या कार्यक्रमाचे आणखी एक विशेष म्हणावे लागेल. ह्या कार्यक्रमाच्या यशामध्ये डॅलस आणि भारतातल्या दानशूर व्यक्तींचे आणि व्यवसायांचे योगदान आहे." मेळाव्याच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात देवकी पंडित यांच्या सुमधुर गायनाने झाली. पंडित हर्षद कानेटकर ह्यांनी तबल्यावर साथ केली आणि एकल तबला वादनाने पंडित झाकीर हुसेन यांना श्रद्धांजली अर्पण केली. श्री अभिनय रवंदे यांनी संवादिनीवर साथ केली. प्रिया पाडळीकर यांचे सूत्र संचलन कार्यक्रमाला साजेसे होते.मैत्री मेळाव्यातील सॅन अँटोनीओ आणि ह्युस्टन येथील मराठी बांधवांचा सहभाग आणि सादरीकरण खूपच वाखाणण्यासारखे होते. त्यांनी रसिकांची दाद मिळवली. मैत्री मेळाव्याची सांगता "गोष्ट मैत्रीची" या अतिशय वेगळ्या आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या कार्यक्रमाने झाली. लहान थोर अशा १०० पेक्षा अधिक कलाकारांनी सादर केलेल्या या कार्यक्रमाने मैत्री मेळाव्याचे उद्दीष्ट सर्वांपर्यंत एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने पोहोचवले. चैतन्य जोशी यांच्या संकल्पनेतून साकारलेली, सुंदर गोष्टींच्या गुंफणात विणलेली आणि मैत्रीच्या सर्व छटांची अलगद उकल करणारी ही कलाकृती रसिकांना खूपच भावली. त्यातील सर्व नृत्यही अतिशय उत्तम आणि समर्पक होते. सर्व कलाकारांनी अगदी जीव ओतून सादरीकरण केले.