अमरावतीत नवनीत राणांचा पराभव; काँग्रेसचे बळवंत वानखेडे विजयी.

मुंबई.
महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी अंतिम टप्प्यात आली आहे. निवडणुकीचे शेवटचे कल समोर येत आहे. अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती होत आहेत. अशातच अमरावती लोकसभा मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाला आहे. काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी नवनीत राणा यांचा पराभव केला आहे. हा भाजपला बसलेला मोठा धक्का मानला जात आहे.
गेल्या २०१९ निवडणुकीत नवनीत राणा अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. यावेळी त्यांना भाजपने उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात काँग्रेसने बळवंत वानखेडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. नवनीत राणा यांच्या उमेदवारीला बच्चू कडू यांनी मोठा विरोध केला होता. महायुतीतील नेत्यांनी कडू यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी कुणालाही न जुमानता बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्याविरोधात प्रहारचा उमेदवार मैदानात उतरवला. बच्चू कडूंनी प्रहारकडून दिनेश बुब यांना उमेदवारी दिली. त्यामुळे यंदा अमरावतीत तिरंगी लढत झाली. अखेर या लढतीत काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी विजय मिळवला. त्यांनी अटीतटीच्या लढतीत नवनीत राणा यांचा पराभव केला.
अखेर या लढतीत काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी विजय मिळवला. त्यांनी अटीतटीच्या लढतीत नवनीत राणा यांचा पराभव केला. एक्झिट पोलच्या आकडेवारीत नवनीत राणा यांचा विजय होईल असं सांगण्यात येत होतं. त्यामुळे नवनीत राणा यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह होता. दरम्यान, बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी नवनीत राणा यांच्या अडचणी वाढल्या होत्या. मात्र, निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या दिवशी नवनीत राणा यांना जात प्रमाणपत्र प्रकरणी दिलासा मिळाला. त्यामुळे त्यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला. नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र कोर्टाकडून अवैध ठरवलं असतं, तर त्यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग खडतर झाला असता.