वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्वच्छ भारत पर्यटन स्थळ येथील फुलबाग ठरतेय आकर्षणाचा केंद्रबिंदू.

वेंगुर्ला.
वेंगुर्ला शहरातील ‘स्वच्छ भारत पर्यटन स्थळ’ या नावातच त्याचे वेगळेपण आहे.या ठिकाणी शहरातील घरोघरी निर्माण होणारा कचरा गोळा करुन त्याचे २७ प्रकारात वर्गीकरण करुन या कच-याचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करुन वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत ‘शुन्य कचरा’ संकल्पना राबवण्यिात येते.
स्वच्छ भारत पर्यटन स्थळ’ अर्थातच कंपोष्ट डेपो येथे आगळया - वेगळया संकल्पना राबवण्यिात वेंगुर्ला नगरपरिषद अग्रेसर असते.त्याचा एक भाग म्हणून कंपोष्ट डेपोमध्ये शेती करण्याचा उपक्रम राबविण्यात आलेला आहे. ज्या ठिकाणी अगोदर कचऱ्याचे ढीग साचले असायचे त्याच ठिकाणी आता फुला- फळांची बाग बहरली आहे. या ठिकाणी लाल भाजी, मका, भेंडी इ.भाजीपाला तसेच सुर्यफुल व झेंडू या सारख्या फुलझाडांची लागवड करण्यात आली आहे.तसेच इकडे विविध प्रकारची फुलझाडे जसे की जाम, पेरू, पपई, चिकू इ. लावून बगीचा फुललेला असून हे सर्व पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
या ठिकाणी नगरपरिषदेमार्फत ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून निर्मित जैविक खत व प्रक्रिया केंद्रातील पाण्याचा वापर सिंचन व झाडांच्या वाढीसाठी करण्यात येत आहे.
येथे काम करणारे नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारी या झाडांच्या जतन व संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. वेंगुर्ला नगरपरिषद स्वच्छतेकडून समृद्धीकडे वाटचाल करत असल्याचे मत मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी व्यक्त केले.