फळपीक विमा हप्ता भरण्यासाठी मुदतवाढ द्या; भाजपा किसान मोर्चाची पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचेकडे मागणी.

सिंधुदुर्ग.
फळपीक विमा योजनेसाठी विमा रक्कम भरण्याची मुदत ३० नोव्हेंबर पर्यंत आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक शेतकरी गतवर्षीच्या विमा लाभापासून वंचित आहेत . तसेच सर्व्हर डाऊन असल्यामुळे ऑनलाईन विमा ज्या साईटवर भरला जातो, ती साईट २४ नोव्हेंबर पासून आजतागायत बंद आहे. त्यामुळे चालु वर्षीचा विमा भरण्यास शेतकरी वंचित रहाणार आहेत .
म्हणून किमान १५ दिवसाची मुदतवाढ मिळावी, अशी मागणी भाजपा किसान मोर्चाच्या वतीने जिल्हाध्यक्ष उमेश सावंत यांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचेकडे केली.
या मागणीची दखल घेत पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे विशेष कार्य अधिकारी संतोष साखरे यांनी तात्काळ जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांचेशी चर्चा करून मुदतवाढीचा प्रस्ताव कृषी आयुक्तांना सादर करण्यास सांगीतला.तसेच मंत्रालय स्तरावर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचेशी पालकमंत्री रविंद्र चव्हाण चर्चा करून मार्ग काढतील असे आश्वासित केले.
ओरस मुख्यालय या ठिकाणी झालेल्या चर्चेत किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई, कोषाध्यक्ष चारुदत्त देसाई, माजी सभापती निलेश सामंत, मालवण किसान मोर्चाचे महेश सारंग उपस्थित होते.