माजी आमदार वैभव नाईक वाढदिवस विशेष....संघर्षाच्या काळातही स्वाभिमान जपणारे निष्ठावंत वैभव नाईक

माजी आमदार वैभव नाईक वाढदिवस विशेष....संघर्षाच्या काळातही स्वाभिमान जपणारे निष्ठावंत वैभव नाईक

 

        महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सत्तेसाठी राजकीय पक्षांच्या झालेल्या अभूतपूर्व फाटाफुटीत अनेक दिग्गज नेत्यांनी आपले मार्ग बदलले आणि सत्ताधारी पक्षाची वाट धरली. परंतु, या सर्वांना वैभव नाईक हे अपवाद ठरले. विधानसभा निवडणुकीत अगदी थोड्या मतांनी त्यांचा पराभव झाला तेव्हा शिवसैनिक आणि जनतेच्या डोळ्यात दुःख, मनात वेदना होत्या. धनशक्तीमुळे जरी वैभव नाईक यांचा पराभव झाला असला तरी त्यांच्या पावलांमध्ये मात्र थांबणे नव्हते. ज्या दिवशी निकाल लागला, त्याच्या दुसऱ्या दिवसापासून ते जनतेच्या प्रश्नांवर पुन्हा रस्त्यावर उतरले. सामाजिक कार्यात खंड पडू दिला नाही. राजकारणातही त्यांनी सक्रिय राहून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे एकीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुका बिनविरोध होत असताना कुडाळ-मालवण मतदारसंघात मात्र वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली सर्व ठिकाणी तुल्यबळ लढत होऊन ४९ हजार मते शिवसेना पक्षाला मिळाली. एकंदरीत विधानसभा निवडणुकीतील पराभव हा वैभव नाईक यांच्या राजकीय प्रवासातील एक तात्पुरता अडथळा ठरला असला तरी  त्यातून पुन्हा उभारी घेत त्यांनी जनतेशी असलेली आपली नाळ तुटू दिली नाही, हे यातून प्रकर्षाने दिसून आले.

   जनता संकटात असताना वैभव नाईक शांत बसले असे कधी झालेच नाही. प्रत्येक अन्यायग्रस्तांचा आवाज होण्याचा प्रयत्न त्यांनी केला. नुकसानग्रस्त आंबा आणि काजू शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना तत्काळ भरघोस मदत देण्याची मागणी केली. तसेच शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनातही ते सहभागी झाले. भातपीक कापणीवेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने थैमान घातले असताना वैभव नाईक यांनी  शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. सरकारला नुकसानीचे पंचनामे करण्यास भाग पाडले. फळपीक विम्याच्या थकीत रक्कमेसाठी आंदोलन करून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळवून दिले. सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजमध्ये रुग्णांची हेळसांड झाल्याने डीन यांना जाब विचारला. गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी कुडाळ तहसील कार्यालयात आंदोलन केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा वाचविण्यासाठी काढलेल्या मोर्चात वैभव नाईक सहभागी झाले. मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनेक नागरिकांचे जीव जात असल्याने सरकारला जाग आणण्यासाठी महामार्गावर त्यांनी रास्तारोको आंदोलन केले. त्याचबरोबर खड्डेमय झालेल्या कुडाळ-मालवण राज्यमार्गावर बैलगाडीद्वारे आंदोलन केले. झाराप तिठा येथील महामार्गावर चुकीच्या मिडलकटमुळे शाळकरी विद्यार्थ्यांच्या झालेल्या मृत्यूचा महामार्ग अधिकाऱ्यांना जाब विचारला म्हणून वैभव नाईक यांना अ‍ॅट्रॉसिटीच्या खोट्या गुन्ह्यात देखील अडकविण्यात आले. मात्र, वैभव नाईक यांना रोखण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी कितीही प्रयत्न केले तरी जिल्ह्यातील प्रश्न सोडवण्यासाठी सत्ताधाऱ्यांशी आणि प्रशासनाशी त्यांचा संघर्ष सुरूच राहणार आहे.    
   
           शिवसेना पक्षात फूट पडली तेव्हापासून ते आतापर्यंत वैभव नाईक यांना पक्षप्रवेशासाठी ऑफर देण्यात येत आहेत. शिंदे गटाच्या अनेक मंत्र्यांनी याचे वेळोवेळी सूतोवाच देखील केले आहे. अलिकडेच त्यांना सत्तेच्या सावलीत येण्याचे निमंत्रणही देण्यात आले. मात्र, निष्ठेच्या कसोटीवर वैभव नाईक तसूभरही डगमगले नाहीत. मतदार आणि शिवसैनिकांसोबत त्यांनी निष्ठावंत राहण्याचा निर्णय घेतला त्यांचा हा बाणेदारपणा आजही कायम आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कुडाळ-मालवण मतदारसंघात २६ हजार मतांनी पीछेहाट झाल्यानंतर पुढे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पराभव समोर दिसत असतानाही वैभव नाईक यांनी पद आणि सत्तेसाठी गद्दारीचा कलंक माथी लावून घेण्याऐवजी, निष्ठेने आहे त्या परिस्थितीत लढाई करणे पसंत केले. आज वैभव नाईक आमदार नसले तरी त्यांनी केलेली शाश्वत विकासाची कामे आजही लोकांसमोर आहेत. त्यामध्ये सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजची स्थापना, कुडाळ येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयाची उभारणी, ऐतिहासिक शिवराजेश्वर मंदिराचे नूतनीकरण व सिंहासनाची उभारणी, सिंधुदुर्ग किल्ले प्रवासी जेटी, कुडाळ, मालवण, ओरोस या बसस्थानकांच्या नूतन इमारतींची बांधणी, कुडाळ येथे अद्ययावत क्रीडासंकुल व क्रीडांगणाची उभारणी, मालवण नळपाणी योजना, मालवण किनारपट्टी भागात भूमिगत विद्युत वाहिन्या, मांडकुली, कोळंब, दुकानवाड, आंबेरी, उपवडे, अणाव, वराड, किर्लोस, पुळास येथील नदीवर मोठ्या पुलांची उभारणी, कुडाळ भंगसाळ नदीवर ब्रिज कम बंधारा, देवबाग येथे जिओ ट्यूब बंधारा, तळाशील देवबाग, सर्जेकोट खोतजुवा, मसुरकर जुवा येथे दगडी धूपप्रतिबंधक बंधारे अशी एक ना अनेक विकासकामे वैभव नाईक यांनी प्रत्यक्षात करून दाखवली आहेत. सत्तेच्या प्रलोभनांपुढे न झुकता, प्रभू श्रीरामांचा 'एकवचनी' आदर्श डोळ्यासमोर ठेवून संघर्षाच्या काळातही स्वाभिमान जपणाऱ्या माजी आमदार वैभव नाईक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!