वाळवंटाचे रूपांतर ऊर्जा महाकाय प्रकल्पात भारताचा 30 गिगावॅटचा 'खावडा पार्क'
आमदाबाद
भारत आपल्या कच्छच्या रणभूमीतील ओसाड जमिनीचे रूपांतर जगातील सर्वात मोठ्या नूतनीकरणक्षम ऊर्जा प्रकल्पात करत आहे. सिंगापूरपेक्षा मोठ्या आणि पॅरिसच्या पाचपट असलेल्या या भागात उभारला जाणारा 'खावडा पार्क' हा 30 गिगावॅट (GW) क्षमतेचा जगातील सर्वात मोठा 'सिंगल-साईट' प्रकल्प ठरणार आहे.
प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये
प्रचंड विस्तार : हा प्रकल्प 72,600 हेक्टर (726 दशलक्ष चौरस मीटर) ओसाड जमिनीवर पसरलेला आहे. ऊर्जा क्षमता : 30 GW एकूण क्षमतेपैकी 20 GWसौर ऊर्जा आणि 10 GW पवन ऊर्जेचा समावेश आहे. लाभार्थी : पूर्ण झाल्यावर हा प्रकल्प सुमारे 18 दशलक्ष (1.8 कोटी) घरांना वीज पुरवेल आणि भारताच्या भविष्यातील विजेच्या मागणीपैकी 10 टक्के वाटा उचलेल. हायबिड मॉडेल : दिवसा सौर ऊर्जा आणि 24 तास उपलब्ध असणारी पवन ऊर्जा यांचा मेळ घालून स्थिर वीजपुरवठा करण्याचे नियोजन आहे. 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाची पायाभरणी केली होती. अदानी ग्गीन एनर्जी आणि टोटल एनर्जीज सारख्या भागीदारांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या प्रकल्पातील 1 GW पेक्षा जास्त क्षमता 2024 च्या सुरुवातीला कार्यान्वित झाली आहे. भारताचे 2030 पर्यंत 500 GW नूतनीकरणक्षम ऊर्जेचे उद्दिष्ट गाठण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. हा प्रकल्प अभियांत्रिकीचा एक अद्भुत नमुना असला तरी, तो कठीणपरिस्थितीत उभारला जात आहे. कडक उन्हाळा, 12 तासांच्या शिफ्टमध्ये काम करणारे कामगार आणि स्थलांतरित मजुरांचे प्रश्नही मोठी आव्हाने आहेत. तसेच, बॅटरी स्टोरेजशिवाय ऊर्जेची सातत्यता राखणे आणि वाळवंटातील नाजूक परिसंस्थेवर होणारे परिणाम यावरही काही तज्ञांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या प्रकल्पाच्या व्हिडीओंनी जगभरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. चंद्रावरील ओसाड जमिनीसारख्या दिसणाऱ्या या भागात आता सौर पॅनल आणि पवनचक्क्यांचे जाळे दिसत आहे. हा प्रकल्प सिद्ध करतो की, ओसाड वाळवंटाचा वापर करून जगाचे भविष्य सुरक्षित केले जाऊ शकते.
konkansamwad 
