पालकमंत्र्यांकडून आपत्ती व्यवस्थापन बैठकीचा केवळ फार्स - वैभव नाईक

कणकवली
पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेतली मात्र गतवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती उद्भवल्याने मोठे नुकसान झाले होते. ओरोस ख्रिश्चनवाडी येथे शासनाने केलेल्या पंचयादीत ११ घरे पूर्णतः कोसळल्याचे नमूद असून त्यांचे एकूण ८९ लाख ४८ हजार रु. नुकसान झाले तर ८७ घरांचे अंशतः नुकसान झाले असून त्याची एकूण २ कोटी ५१ लाख ५७ हजार रु. नुकसानीची नोंद आहे. ०७/०७/२०२४ रोजी या नुकसानीची पंचयादी घालण्यात आली असून एकट्या ओरोस येथील घरांच्या नुकसानीची एकूण ३ कोटी ४१ लाख रु नुकसान भरपाई वर्ष झाले तरी सरकारकडून नुकसानग्रस्तांना मिळालेली नाही. अशाच प्रकारे जिल्ह्यात इतर ठिकाणीही अनेक घरे कोसळली, घरांचे नुकसान झाले तसेच पुराच्या पाण्यामुळे शेतीचेही नुकसान झाले होते.त्या सर्वांची कोट्यवधी रुपयांची नुकसान भरपाई असून महायुती सरकारकडून एक रुपया देखील नुकसानग्रस्त नागरिकांना अथवा शेतकऱ्यांना देण्यात आला नाही. हि नुकसान भरपाई मिळण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे यांनी कुठला पत्रव्यवहार केला हे त्यांनी जाहीर करावे. सत्ताधारी राणे कुटुंबाने आणि अधिकाऱ्यांनी कुठलाच पाठपुरावा केला नाही त्यामुळे सिंधुदुर्गवासीय नुकसान भरपाईपासून वंचित राहिले आहेत. आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीतही गतवर्षीच्या नुकसान भरपाईवर कोणतीही चर्चा पालकमंत्र्यांनी घडवून आणली नाही. अधिकाऱ्यांनीही त्याची आठवण करून दिली नाही. त्यामुळे हि बैठक केवळ फार्स असून त्यातून जनतेला काही मिळणार नसल्याची टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. नाईक पुढे म्हणाले, गतवर्षी जुलै महिन्यात सिंधुदुर्गमध्ये मोठ्या प्रमाणात पूरस्थिती उद्भवल्याने जिल्हावासियांचे मोठे नुकसान झाले होते. मुंबई-गोवा महामार्ग देखील काही काळ ठप्प होता. ओरोस ख्रिश्चनवाडी येथील घरांमध्ये पुराचे पाणी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.या पुराच्या पाण्यामुळे नागरिकांची १० घरे पूर्णतः कोसळली असून अनेक घरांचे नुकसान झाले होते. जिल्ह्याची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा देखील त्याठिकाणी उशिरा पोहचली.आता केवळ फार्स म्हणून पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेतली आहे. मात्र या बैठकीत गतवर्षीच्या नुकसान भरपाईबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. आणि अधिकाऱ्यांनीही नुकसान भरपाईची आठवण पालकमंत्र्यांना करून दिली नाही. ठाकरे सरकारच्या काळात नैसर्गिकरित्या झालेल्या नुकसानीवेळी नुकसानग्रस्तांना झिरो बॅलन्स अकाऊंट मध्ये नुकसान भरपाई रक्कम जमा करण्यात आली होती. गतवर्षी राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील आपत्ती काळात तात्काळ मदत जाहीर करण्यात आली होती मात्र राज्याचे आणि देशाचे राजकारण करणाऱ्या नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे यांना मात्र स्वतःच्या जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना सरकारकडून मदत मिळवून देता आली नाही ही वस्तुस्थिती असल्याची टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.