आयुष्मान वय वंदना योजनेचा लाभ घ्यावा......जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांचे नागरिकांना आवाहन

सिंधुदुर्गनगरी
भारत सरकारने 1 एप्रिल 2025 पासून 70 वर्षावरील सर्व जेष्ठ नागरिकांना त्यांचे उत्पन्न विचारात न घेता आयुष्मान वय वंदना योजनेंतर्गत मोफत आरोग्य कव्हरेज प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. तरी जिल्ह्यातील 70 वर्ष व त्यावरील नागरीकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी केले आहे.आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह एकत्रितपणे राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या निर्णयानुसार वेळोवेळी इतर लाभार्थी कुटुंबांचा समावेश करण्यात येऊन त्यांना आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत विनामुल्य वैद्यकीय लाभ प्रदान करण्यात येत आहे.आधार कार्डद्वारे लाभार्थ्यांची ई-केवायसी केली जाते. BIS 2.0 प्रणालीमधील आयुष्मान वयवंदना या टॅबमध्ये जाऊन लाभार्थ्यांच्या आधार कार्डद्वारे पडताळणी करुन त्याची ई-केवायसी केली जाते. ऑपरेटर लॉगिनद्वारे क्षेत्रिय स्तरावरील आशा कर्मचारी, आपले सरकार सेवा केंद्राचे कर्मचारी तसेच स्वस्त धान्य दुकानचालक यांच्यामार्फत आयुष्मान वय वंदना कार्ड निर्माणाचे काम चालु आहे. तसेच beneficiary पर्यायाद्वारे लाभार्थी स्वतः आपले कार्ड निर्माण करुन घेऊ शकतात. ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड स्वयंम मंजूर होऊन ते क्षेत्रिय स्तरावरील कर्मचाऱ्यामार्फत लाभार्थ्यापर्यंत पोहोचवले जाते.एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत समाविष्ट जेष्ठ नागरिकांना आयुष्मान वय वंदना योजनेचे स्वतंत्र आयुष्मान कार्ड वितरीत करण्यात येणार आहे. एकत्रित योजनेच्या प्रतिवर्ष प्रतिकुटूंब 5 लाखापर्यंतच्या मोफत उपचारा बरोबरच आयुष्मान वय वंदना योजनेच्या लाभार्थ्यांना अतिरिक्त लाख रुपयांचे टॉपअप प्रदान करण्यात येणार असुन योजनेंतर्गत आधिकृत रुग्णालयामधून 1 हजार 356 उपचार पद्धतींवर मोफत उपचार अनुज्ञेय आहेत. जिल्ह्यातील 70 वर्ष व त्यावरील नागरीकांनी आयुष्मान वय वंदना योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.