आजपासून १२ वी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात

आजपासून १२ वी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात


सिंधुदुर्गनगरी


        उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च कालावधीत होत आहे. इ. 10 वी च्या परीक्षेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 41 परीक्षा केंद्रे आहेत. तर 12 वी च्या परीक्षेसाठी 23 परीक्षा केंद्रे आहेत. इ. 10 वी च्या परीक्षेसाठी एकूण 9006 विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत, तर 12 वी च्या परीक्षेसाठी एकूण 8,487 विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत. यावर्षी होणाऱ्या इ. 10 वी व इ. 12 वी परीक्षांच्या धर्तीवर कॉपी प्रकरणास पूर्णतः प्रतिबंध करण्यासाठी राज्यभर कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचे आवाहन शासनाचे मुख्य सचिव यांनी केले असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांनी दिली आहे. इ.12 वी व इ.10 वी ची परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व निकोप वातावरणामध्ये सुरळीतपणे पार पाडावी यासाठी महाराष्ट्र शासन व मंडळ प्रयत्नशील आहे. यासंदर्भात मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली व प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची दूरचित्र प्रणालीव्दारे बैठक घेण्यात आली आहे. त्याअनुषंगाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येणार आहे.राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्र परिसरामध्ये जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन कॅमेराव्दारे परीक्षा केंद्राची निगराणी करण्यात येईल. परीक्षा सुरू होण्या अगोदर एक दिवस आधी परीक्षा केंद्रावर आवश्यक भौतिक सुविधा सुव्यवस्थित आहेत का? याची जिल्हा प्रशासनाकडून खात्री केली जाईल. परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनामार्फत व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व विभागाचे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर भरारी पथके व बैठी पथके उपलब्ध होतील याचे नियोजन करण्यात येणार आहे. विभागीय मंडळामार्फत परीक्षेशी संबंधित सर्व घटकांना अधिकृत ओळखपत्र देण्यात येईल. Maharashtra Prevention of Malpractices Act 1982 या कायद्याची अंमलबजावणी करावी व कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे व प्रत्यक्ष गैरमार्ग करणाऱ्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल. परीक्षा केंद्रापासून 500 मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहेत तसेच संबंधित परीक्षा केंद्राच्या परिसरात 144 कलम लागू करण्यात येईल. उपरोक्तप्रमाणे सर्व उपाययोजना करण्यात येणार असून याची सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक व परीक्षेशी संबंधित सर्व घटक यांनी नोंद घ्यावी.