भंडारी समाजातून जास्तीत जास्त प्रशासकीय अधिकारी घडावेत : सत्यवान रेडकर. ९७ वा विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न.

भंडारी समाजातून जास्तीत जास्त प्रशासकीय अधिकारी घडावेत : सत्यवान रेडकर.  ९७ वा विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न.

वेंगुर्ला.

   कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी, मुंबई संस्थेच्या वतीने रविवार, दिनांक 29 ऑक्टोबर रोजी 97 वा विद्यार्थी गुणगौरव सभारंभ कित्ते भंडारी सभागृह, दादर (प) येथे संपन्न झाला.प्रथम रावबहादुर सिताराम केशव बोले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलन करण्यात आले.
   मुख्य अतिथि व मार्गदर्शक स्वरूपात श्री. सत्यवान यशवंत रेडकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार तसेच संस्थापक, तिमिरातुनी तेजाकडे त्याचप्रमाणे श्री.नरेंद्र चंद्रकांत शिरधनकर, सौ. तृप्ती दशरथ हातिसकर मंचावर उपस्थित होते.सर्व मान्यवरांनी मनोगत व आपले विचार प्रकट केले. गुणगौरव सोहळ्यात उपस्थित विद्यार्थी व पालकवर्ग यांच्यासाठी शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रदान करण्यात आले.
   यावेळी प्रमुख मार्गदर्शक सत्यवान यशवंत रेडकर यांनी उपस्थित प्रेक्षकवर्गास संबोधित करीत असताना अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात विविध उदाहरणे देत स्पर्धा परीक्षांबद्दल माहिती, जीवनप्रवास, त्यांचा अभ्यास करण्याची पद्धती यांवर कटाक्ष टाकला. यावेळी काही विद्यार्थ्यांनी व पालकांनी मंचावर येऊन आपल्या प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त केल्या.
    मार्गदर्शन करताना श्री. सत्यवान यशवंत रेडकर ज्ञातीबांधवांना संबोधित करताना म्हणाले की “आपल्या मुलांमध्ये कमालीची क्षमता आहे परंतु मार्गदर्शनाच्या अभावी हे विद्यार्थी मागे राहतात परिणामी शासकीय संधींचा लाभ घेण्यात कमी पडतात. माझा शैक्षणिक उपक्रम नसून ही एक चळवळ आहे व याची जनजागृती होणे अपेक्षित आहे, यापुढे तिमिरातुनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीचा प्रसार प्रत्येक घरा-घरात पोहचवण्यासाठी प्रयत्न करा.सर्वांना निशुल्क मार्गदर्शन प्राप्त होत राहील.भंडारी समाजातून जास्तीत जास्त प्रशासकीय अधिकारी घडावेत,” दे ललकारी, जय भंडारी या जयघोषाने सभागृहात चैतन्यमय वातावरण निर्मित झाले व उपस्थितांना एक नवीन प्रेरणा प्राप्त झाली.
   मार्गदर्शन व्याख्यान समाप्तीनंतर विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम पार पडला. यावेळेस विद्यार्थ्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र तसेच भेटवस्तु देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास अध्यक्ष भरत शेट्ये, उपाध्यक्ष आनंद मयेकर, विश्वस्त नवीनचंद्र बांदिवडेकर,निवेदक व कार्याध्यक्ष भूपेंद्र देवकर,विश्वस्त मधुकर तोडणकर, विश्वस्त दिपक तवसाळकर, विश्वस्त विलास सुर्वे, त्याचप्रमाणे श्री.व सौ.नंदिता दत्ता पेडणेकर,श्री.व सौ.अरूणा अरविंद पारकर उपस्थित होते.
   श्री.संजय भरणकर यांनी आभार प्रदर्शन केले.श्री. संतोष मांजरेकर यांनी निमंत्रक व कार्यक्रमाचे अन्य व्यवस्थापन स्वरूपात आपली भूमिका पार पाडली व अन्य सदस्यांनी सुद्धा यात आपले योगदान दिले. राष्ट्रगीत समाप्ती नंतर कार्यक्रम संपन्न झाला.