टीम इंडिया फायनलमध्ये ! जेतेपदासाठी न्यूझीलंडला भिडणार

टीम इंडिया फायनलमध्ये ! जेतेपदासाठी न्यूझीलंडला भिडणार

 

मुंबई

 

      मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चौकार-षटकारांचा पाऊस पडला. भारताच्या २५३ धावांना इंग्लंडकडूनही सडेतोड उत्तर मिळाले.संजू सॅमसनच्या वादळी खेळीला इंग्लंडच्या जेकब बेथल ने अविश्वसनीय खेळीसह प्रत्युतर दिले. पण, जसप्रीत बुमराहची दोन षटक राखून ठेवण्याचा डाव यशस्वी झाला आणि भारताने हा सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताने शवेटच्या पाच षटकांत पुनरागमन केले आणि आता जेतेपद कायम राखण्यासाठी न्यूझीलंडला भिडणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होईल.भारतीय संघाने टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ७ बाद २५३ धावा उभ्या केल्या, ज्या वर्ल्ड कप नॉक आऊट फेरीतील सर्वोच्च धावसंख्या ठरल्या. संजू सॅमसनने ४२ चेंडूंत ८ चौकार व ७ षटकारांसह ८९ धावांची वादळी खेळी केली. त्याने इशान किशनसह ४५ चेंडूंत ९७ धावा जोडल्या. इशान १८ चेंडूत ३९ धावा करून माघारी परतला. शिवम दुबेने २५ चेंडूंत ४३ धावा करताना १ चौकार व ४ षटकार लगावले. हार्दिक पांड्या (२७), तिलक वर्मा (२१) यांनीही चांगले योगदान दिले. संजू सॅमसनने टी-२० वर्ल्ड कपच्या एका पर्वात सर्वाधिक १६ षटकारांचा विक्रम नावावर करताना रोहित शर्मा (१५) २०२४ च्या वर्ल्ड कपचा विक्रम मोडला.भारतीय संघाने टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या आजच्या डावात १९ षटकार खेचले. जे वर्ल्ड कपमधील एका डावातील संयुक्तपणे सर्वाधिक षटकार ठरले. हार्दिक पांड्याने दुसऱ्याच षटकात इंग्लंडला धक्का दिला आणि फिल सॉल्टला (५) माघारी पाठवले. जसप्रीत बुमराहने पाचव्या षटकात कर्णधार हॅरी ब्रूकला (७) बाद केले. अक्षर पटेलने पळत जाऊन अविश्वसनीय झेल टिपला. जॉस बटलर व जेकब बेथल ही जोडी भारताची डोकेदुखी वाढवताना दिसली. बेथेलने सलग तीन षटकार खेचून वरूण चक्रवर्थीचे स्वागत केले. पण, त्याच षटकात बटरलचा (२५) त्याने त्रिफळा उडवला.अक्षर पटेलने आठव्या षटकात टॉम बँटनचा (१७) त्रिफळा उडवून इंग्लंडला ९५ धावांवर चौथा धक्का दिला. जेकबने १९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि वर्ल्ड कपमधील इंग्लिश फलंदाजाकडून झालेले हे वेगवान अर्धशतक ठरले. इंग्लंडने ४ विकेट गमावल्या असल्या तरी त्यांच्या धावांची गती ही १२ च्या सरासरीने सुरू होती. जेकब व विल जॅक्स यांनी २७ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी करताना भारतीय गोलंदाजांनाही दडपणाखाली ठेवले. भारताचे मनोबल उंचावण्याची भूमिका प्रेक्षक चोख पार पाडताना दिसले. इंग्लंडला अजूनही ७ षटकांत ९४ धावांची गरज होती आणि जसप्रीतची दोन षटक कर्णधाराने राखून ठेवलेली.अर्शदीपने १४ व्या षटकात ७७ धावांची ही भागीदारी तोडली. विल जॅक्स २० चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ३५ धावांवर झेलबाद झाला. आता सहा षटकांत ८२ धावा असा सामना इंग्लंडच्या हातून निसटताना दिसला. १५व्या षटकात १३ धावा आल्या आणि ३० चेंडू ६९ धावा असा सामना चुरशीचा झाला. जसप्रीतने १६ व्या षटकात फक्त ८ धावा देताना भारताला सामन्यात पुनरागमन करून दिले. अर्शदीपने १७व्या षटकात १६ धावा दिल्याने सामना १८ चेंडूंत ४५ धावा असा जवळ आला, परंतु जसप्रीतने १८व्या षटकात फक्त ६ धावा दिल्या आणि स्पेल ४-०-३३-१ अंती संपवली.आता १२ चेंडूंत ३९ धावा असा सामना भारताच्या हातात आलेला आणि हार्दिक १९ वे षटक फेकायला आला.बेथलने षटकाराने आपले शतक पूर्ण केले, त्याने ४५ चेंडूंत तिहेरी धावसंख्या गाठली. तिसऱ्या चेंडूवर सॅम करनचा(१८) सीमारेषेवर तिलकने झेल टिपला. करन व बेथलने २७ चेंडूंत ५० धावा जोडल्या. हार्दिकने फक्त ९ धावा देत १ विकेट घेतली आणि मॅच ६ चेंडू ३० धावा अशी इंग्लंडच्या हातून निसटली. शिवम दुबेच्या पहिल्या चेंडूवर दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात बेथल रन आऊट झाला. त्याने ४८ चेंडूंत ८ चौकार व ७ षटकारांसह १०५ धावांची अविश्वसनीय खेळी केली. भारताने ही मॅच जिंकून फायनलमध्ये प्रवेश पक्का केला.इंग्लंडने २० षटकांत ७ बाद २४६ धावांपर्यंत मजल मारली आणि भारताने ८ धावांनी मॅच जिंकली.