एस.टी. कर्मचारी महिलांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा
वेंगुर्ला
वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस आणि कै. गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री सांस्कृतिक मंच दाभोली, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने एस.टी. कर्मचारी महिलांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.आजच्या आधुनिक युगात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही ग्रामीण व शहरी भागांना जोडणारी महत्त्वाची कडी ठरली आहे. विशेषतः एस.टी. सेवा ही ग्रामीण जनतेसाठी जीवनवाहिनी मानली जाते. शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच दैनंदिन प्रवासासाठी एस.टी.वर अवलंबून असलेल्या लाखो नागरिकांच्या जीवनात या सेवेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर एस.टी. महामंडळात कार्यरत महिला कर्मचाऱ्यांच्या अनुभवांना व विचारांना अभिव्यक्ती देण्यासाठी ही राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या वर्षीच्या स्पर्धेसाठी *“एस.टी. म्हणजे ग्रामीण जनतेची जीवनवाहिनी”* हा विषय निश्चित करण्यात आला असून एस.टी. महामंडळात कार्यरत सर्व महिला कर्मचाऱ्यांसाठी ही स्पर्धा खुली आहे. सहभागी स्पर्धकांनी किमान ७०० ते कमाल १००० शब्दांत स्व:हस्ताक्षरात मराठीत निबंध लिहून सादर करावयाचा आहे. निबंधासोबत एस.टी. कर्मचारी असल्याचे प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य राहील.स्पर्धेतील विजेत्यांसाठी प्रथम क्रमांकास रोख ₹१०००, द्वितीय क्रमांकास ₹७०० आणि तृतीय क्रमांकास ₹५०० अशी रोख पारितोषिके देण्यात येणार असून त्यासोबत प्रमाणपत्र व चषक प्रदान करण्यात येणार आहे. तसेच दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी ₹२५० रोख, प्रमाणपत्र व चषकासह देण्यात येतील.स्पर्धेसाठी निबंध स्व:हस्ताक्षरात लिहून पोस्टाने किंवा प्रत्यक्ष हाती वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस; द्वारा डॉ. सचिन वासुदेव परुळकर, मु.पो. तुळस, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग, पिन – ४१६५१५ या पत्त्यावर दिनांक १० एप्रिल २०२६ पर्यंत पाठवावेत. अधिक माहितीसाठी डॉ. सचिन परुळकर (९४२१२३८०५३) यांच्याशी संपर्क साधावा.या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेस एस.टी. कर्मचारी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आंतरराष्ट्रीय पंच व क्रीडा संस्कृती प्रचारक अशोक दाभोलकर-मेस्त्री तसेच वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष विवेक तिरोडकर यांनी केले आहे.

konkansamwad 
