कैलास मानसरोवर यात्रा होणार 'या' महिन्यात......केंद्र सरकारने केली घोषणा

कैलास मानसरोवर यात्रा होणार 'या' महिन्यात......केंद्र सरकारने केली घोषणा

 


नवी दिल्ली 

 

          कैलास मानसरोवर यात्रा ३० जून ते २५ ऑगस्ट २०२५ दरम्यान आयोजित केली जाणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने केली. यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. १३ मे पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. यावर्षी एकूण १५ तुकड्यांमध्ये ७५० यात्रेकरु जाणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, प्रत्येकी ५० यात्रेकरूंच्या ५ तुकड्या उत्तराखंडमधील लिपुलेख खिंडीतून आणि प्रत्येकी ५० यात्रेकरूंच्या १० तुकड्या सिक्कीमच्या नाथू खिंडीतून प्रवास करणार आहेत.अशा प्रकारे एकूण ७५० यात्रेकरु यावर्षी यात्रेत सहभागी होणार आहेत. ऑनलाईन दाखल केलेल्या अर्जदारांमधून यात्रेकरूंची निवड केली जाणार आहे. उत्तराखंडमार्गे ५ तुकड्यांमध्ये २५० यात्रेकरु जाणार आहेत. यांना २२ दिवसांचा अवधी लागेल आणि प्रति व्यक्ती अंदाजे खर्च १.७४ लाख रुपये असेल. तर सिक्कीममार्गे १० तुकड्यांमध्ये ५०० यात्रेकरु जातील. त्यांना २१ दिवसांचा अवधी लागेल आणि प्रति व्यक्ती खर्च २.८३ लाख रुपये असेल, अशी माहिती यात्रेच्या संकेतस्थळावर दिली आहे.दरम्यान, कैलास मानसरोवर यात्रा धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वासाठी ओळखली जाते. कैलास मानसरोवर चीनव्याप्त तिबेटमध्ये आहे. भारताचे परराष्ट्र मंत्रालय दरवर्षी या सहलीचे आयोजन करते. तथापि, गेल्या काही वर्षांपासून चीन भारतीयांना कैलास मानसरोवरला जाऊ देत नव्हता. दोन्ही देशांमधील सीमा वाद आणि कोविड हे याचे कारण होते. यावर्षी ही यात्रा होणार आहे. २०१५ पासून, यात्रेची अर्ज प्रक्रिया ऑनलाइन करण्यापासून ते प्रवाशांच्या निवडीपर्यंतची प्रक्रिया पूर्णपणे संगणकीकृत आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.