शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचा एल्गार मोर्चा.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचा एल्गार मोर्चा.

 

सिंधुदुर्गनगरी

 

        शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला योग्य हमीभाव, थकलेला पिकविमा, सिंचन अनुदान व इतर मागण्यांकरिता सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस तथा जिल्हा काँग्रेस प्रभारी अजिंक्य देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. महायुतीने विधानसभा निवडणूकीच्या काळात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली जाईल असे आश्वासन आपल्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून दिले पण महाराष्ट्रात महायुतीची सत्ता स्थापन होऊन बरेच महिने झाले तरी देखील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. महायुती सरकार मधील काही मंत्री कर्जमाफी सारखे कोणतेही आश्वासन दिले नसल्याचे सांगत आहेत. यातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. फक्त मते मिळवण्याकरिता महायुतीने आपल्या जाहीरनाम्यात खोट्या आश्वासनांचे आमिष दिल्याचे यातून स्पष्ट होत आहे.काँग्रेस नेत्यांची सरकारकडे मागणी आहे की 3 मार्चपासून सूरू होत असलेल्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तरतूद करण्यात यावी तसेच शेतकऱ्यांची अवजारे, औषधे इत्यादींवर लावण्यात आलेला जीएसटी रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. काजू पिकाला तसेच आंबा कॅनींगला योग्य हमी भाव देण्यात यावा. सिंधुदुर्गातील बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही  पिक विम्याची रक्कम मिळालेली नसून केंद्र सरकार व राज्य सरकार विमा हप्त्याचा आपला हिस्सा विमा कंपन्यांना वेळेवर देत नसल्यामुळे पिक विमा शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नाही. सरकारच्या अशा धोरणांमुळे शेतकऱ्यां समोर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. तरी या सर्व बाबींची महाराष्ट्र सरकारने दखल घ्यावी अन्यथा सरकार विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख व सर्व पदाधिकारी यांच्याकडून देण्यात आला आहे.
     यावेळी जिल्हा काँग्रेस पदाधिकारी साईनाथ चव्हाण, ऍड. दिलीप नार्वेकर, प्रकाश जैतापकर, मेघनाथ धुरी, विनायक मेस्त्री, प्रवीण वरुणकर, रवींद्र म्हापसेकर, किरण टेंबुलकर, प्रदीप मांजरेकर, विधाता सावंत, विजय सावंत, आत्माराम सोकटे, जेम्स फर्नांडिस, तुषार भाबल, महेश परब, मधुकर लुडबे, प्रवीण मोरे, कमलाकर हिंदळेकर, हेमंत माळकर, सुरज घाडी, अनिकेत दहिबावकर, बाबू गवस, महेंद्र मांजरेकर, केतनकुमार गावडे, उमेश कुलकर्णी, संजय लाड, महेंद्र सांगेलकर, चंद्रशेखर जोशी, तबरेज शेख, अभय शिरसाट, विजय प्रभू, कृष्णा धाऊसकर तसेच इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.