महिला पोलिसांसाठी राज्यस्तरीय खुल्या निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन

वेंगुर्ला
वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस आणि कै.गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री सांस्कृतिक मंच, दाभोली यांच्या संयुक्त विद्यमाने महिला पोलिसांसाठी राज्यस्तरीय खुल्या निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असणाऱ्या पोलिस दलात महिला पोलिसांचे योगदान अतुलनीय आहे. कठोर वर्दीत, शिस्तबद्ध आणि कणखर स्वभाव असतानाही, त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळाच ममतेचा स्पर्श असतो. त्या केवळ एक पोलिस अधिकारी नसून, एक आई, पत्नी, मुलगी, बहीण आणि समाजाच्या सुरक्षेच्या जबाबदारीने भारावलेल्या योद्धाही असतात. त्यांचे जीवन हे कर्तव्य आणि कुटुंब यांच्यात समतोल साधण्याचा एक संघर्ष असतो.आजच्या घडीला महिला विविध क्षेत्रांमध्ये आघाडीवर असून, कायदा आणि सुव्यवस्थेच्या राखणीत महिला पोलिस महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. त्यांचा संघर्ष, कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक भान यांना उचित व्यासपीठ मिळावे, तसेच समाजात त्यांचा ठसा उमटावा, यासाठी या निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. "कठोर वर्दीत ममतेचा स्पर्श - महिला पोलिसांची दुहेरी जबाबदारी", हा स्पर्धेचा विषय असेल. महिला पोलिसांनी किमान ७०० ते कमाल १००० शब्दांमध्ये मराठीत आपले विचार मांडायचे आहेत. सोबत महिला पोलिस असल्याचे शिफारसपत्र जोडणे अनिवार्य आहे. यात पारितोषिक म्हणून प्रथम क्रमांक–रोख ₹१०००,चषक आणि प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक-रोख ₹७००,चषक आणि प्रमाणपत्र,तृतीय क्रमांक –रोख ₹५००,चषक आणि प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ प्रथम - रोख ₹२५०, चषक आणि प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ द्वितीय -रोख ₹२५०, चषक आणि प्रमाणपत्र. स्पर्धेसाठी निबंध स्व:हस्ताक्षरात लिहून पोस्टाने किंवा प्रत्यक्ष हाती खालील पत्त्यावर ०५ एप्रिल २०२५ पर्यंत पाठवावा.
वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस;
द्वारा: प्रा.डॉ.सचिन वासुदेव परुळकर, मु.पो. तुळस, ता.वेंगुर्ला,जिल्हा सिंधुदुर्ग, पिन - ४१६५१५.
अधिक माहितीसाठी प्रा.डॉ.सचिन परुळकर (९४२१२३८०५३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आंतरराष्ट्रीय पंच व क्रीडा संस्कृती प्रचारक अशोक दाभोलकर-मेस्त्री आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर यांनी केले आहे.