विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार : काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला.

मुंबई.
लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं आहे. जवळपास ३० जागा निवडून आल्या आहेत. त्यानंतर लगेचच शिवसेना आणि काँग्रेस श्रेयवादाची लढाई सुरू झाली होती. दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडून काही विधान करण्यात आली होती. त्यामुळे महाविकास आघाडीत आता फूट पडणार अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांनी याचं खंडन केलं असून आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्यांच म्हटलं आहे.
महाविकास आघाडीने महाराष्ट्रात चांगलं काम केलं, त्यासाठी उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन करायला आलो होतो. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मविआ एकत्र लढणार आणि सरकार स्थापन करणार आहे. विशाल पाटील यांच्याबाबत उद्धव ठाकरे यांच्यासोबत काही चर्चा झालेली नाही. विशाल पाटील हे काँग्रेससोबत आहेत, इंडिया आघाडीसोबत आहेत, हे चांगलं आहे. तसंच 400 जागा मिळाल्या असत्या तर यांनी संविधान बदललं असतं, असंही ते म्हणाले. शिवसेनासोबत नसती तर काँग्रेसच्या इतक्या जागा आल्या असत्या का? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला होता. त्याला नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. मात्र संजय राऊत यांनी य़ावर आज सारवासारव केली आहे. काही जागांवर शिवसेनेने मदत केली नसती तर आणि काँग्रेस आम्हाला मदत केली नसती तर हे यश शक्य नसतं असं म्हटलं आहे.
महाविकास आघाडीत कोणी कोणी लहान आणि कोणी मोठा भाऊ नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. टीका सुरू होताच श्रेयवादाचा सूर मावळला आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या ३० जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकांचं गणित या जांगावरून मांडण्यात येत आहे. एका एका लोकसभा मतदारसंघात ६ विधानसभा मतदारसंघ असतात म्हणजे महाविकास आघाडीच्या ३० लोकसभेच्या जागांवर १५० विधासभेच्या जागा निवडू येतील असा अंदाज आतापासूनच वर्तवण्यात येत आहे. पण त्या त्यावेळची समीकरणे वेगळी असतात. तसंच अद्याप विधानसभेला ४ महिने बाकी आहेत. तोपर्यंत राजकीय समीकरणं काय असतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.