सायबर गुन्हेगारांपासून आपली आर्थिक फसवणूक होण्यापासून सावध रहावे : जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी.

सायबर गुन्हेगारांपासून आपली आर्थिक फसवणूक होण्यापासून सावध रहावे : जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी.

रत्नागिरी.

  सायबर गुन्हेगार हे पोलीस अधिकारी, शासकीय अधिकारी तसेच ईडी विभागाचे अधिकारी असल्याचे भासवतात तसेच बनावट पोलीस अथवा शासकीय विभागाचे बनावट ओळखपत्रे पाठवून, पिडीत व्यक्तीला फोन केला जातो व पिडीत व्यक्तीच्या आधारकार्डचा गैरवापर करुन त्याद्वारे बनावट सीमकार्ड खरेदी केले जाते व त्याआधारे फोन कॉल वरून तुमच्या नावावर कोणीतरी  बँक अकाऊंट सुरु केलेले आहे व त्यावर मनी लॅड्रींगचे पैसे जमा झालेले आहेत व तुमच्या विरुध्द आता ईडी/शासकीय चौकशी लागणार असून तुमचे बँक अकाऊंट व प्रॉपर्टी सील करण्यात येणार आहे असे सांगितले जाते.
   हे प्रकरण मिटविण्याकरीता सायबर गुन्हेगार हे तुम्ही पैसे द्या किंवा तुमचा सहभाग नसल्याचे सिध्द करण्यासाठी तुमचे बँक अकाऊंट व्हेरीफाय करणे गरजेचे आहे व त्याकरीता काही रक्कम पाठवा. तुमचे व्हेरीफिकेशन झाल्यावर तुमचे पैसे परत पाठविले जातील असे सांगून जनतेची आर्थिक फसवणूक करत असल्याचे समोर आलेले आहे. तरी सर्व नागरिकांनी सर्वच प्रकारच्या सायबर गुन्ह्यांपासून सावध राहणे आवश्यक आहे. कोणत्याही तातडीच्या शंका किंवा समस्यांसाठी, कृपया आमच्या सायबर पोलीस ठाणे हेल्पलाइन नंबर 8830404650 वर संपर्क साधावा अथवा डायल-112 वर संपर्क साधावा. सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्याकरीता आपण आपल्या मोबाईलवर आलेले अनोळखी कॉल व सोशल मिडीयावर येणाऱ्या अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये तसेच अनोळखी व्यक्तींनी पाठविलेल्या लिंकवर क्लिक करु नये असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे.