सातारा जिल्ह्याचे राजकारण यापुढे मी आणि शिवेंद्रराजेच करणार; खासदार उदयनराजे भोसले यांनी दंड थोपटले.

सातारा जिल्ह्याचे राजकारण यापुढे मी आणि शिवेंद्रराजेच करणार; खासदार उदयनराजे भोसले यांनी दंड थोपटले.

सातारा.

  नुकत्याच पार पडलेल्या सातारा लोकसभा निवडणुकीच्या चुरशीच्या लढाईत भाजपच्या उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदे यांचा पराभव केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात विजय खेचून आणल्यानंतर उदयनराजे भोसले यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. त्यामुळे आता खासदार उदयनराजे भोसले यांनी आगामी काळात सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर आमचीच पकड राहील, असे सांगत दंड थोपटले. ते शुक्रवारी साताऱ्यातील कोरेगाव येथे पार पडलेल्या मेळाव्यात बोलत होते.
   यावेळी उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत शा‍ब्दिक फटकेबाजी केली. आता शिवेंद्रराजे आणि मी एकत्र आलोय. आता मला बघायचे आहे की, जिल्ह्याच्या राजकारणात कोण काय करतंय? कोणीही किती शड्डू ठोका, असे सांगत उदयनराजे भोसले यांनी दंड थोपटत विरोधकांना आव्हान दिले. आता कोणी कितीही शड्डू ठोकले, कोणीही येऊ दे, अगदी वरचा देव जरी आला तरी इथे माझा देव  महेश शिंदे, शिवेंद्रराजे, मनोज घोरपडे, अतुल भोसले हे माझ्यासोबत आहेत, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले.
   यावेळी उदयनराजे भोसले यांनी आपल्या समर्थकांना गाफील न राहण्याचा सल्लाही दिला. उदयनराजे आता निवडून आले म्हणजे सगळे झाले, असे समजू नका. तुम्ही निवांत राहिलात तर मेलाच म्हणून समजा, असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले. खासदार उदयनराजे भोसले यांचा लोकसभा निवडणुकीत विजय झाल्यानंतर त्यांनी जिल्ह्यात आभार दौरा सुरू केला आहे. त्यानुसार पहिला मेळावा कोरेगाव येथे झाला. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या हटके शैलीत भाषण करताना यापुढे सातारा जिल्ह्याचे राजकारण मी आणि शिवेंद्रराजे करणार असल्याचे स्पष्ट केले.