भंडारी समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी देणाऱ्या राजकीय पक्षाच्या पाठीशी भंडारी समाजाने उभे राहावे. माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांचे आवाहन.

वेंगुर्ला.
लोकसभा निवडणुक केव्हाही जाहीर होईल.सर्वच्या सर्व राजकीय पक्ष सक्रीय झाले आहेत. सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदार संघात भंडारी समाजाचे 40 टक्के मतदार आहेत. याचा विचार करून जो राजकीय पक्ष भंडारी समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी देईल त्या राजकीय पक्षाच्या पाठीशी भंडारी समाजाने उभे राहावे असे आवाहन माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराजांनी भंडारी समाजाला एक इमानदार व प्रमाणिक समाज म्हणून भंडारगृह राखण्यासाठी नेमणुक केली होती. मानसन्मान दिला होता. आताच्या कोणत्याच राजकारण्यांकडून तसे दिसत नाही. पुर्वी एकसंघ रत्नागिरी जिल्हा असताना भंडारी समाजाचे 05 आमदार-रत्नागिरी जिल्ह्यातच होते.आम्ही इतर जातीच्या विरोधात नाही.परंतु आपल्या समाजाचा कोणताही नेता, पुढारी, आमदार, खासदार पाहीजेच असतो असे श्री. तळवणेकर यांनी म्हटले आहे.
माजी आमदार शंकर कांबळी ज्यावेळी आमदार होते त्यावेळी मा.आमदार शंकर कांबळी जवळ कोणी गेला तरी श्री कांबळी ज्यांच्या जवळ काम आहे त्यांना आपुलकीने सांगायचे की, माझा ज्ञातीबांधव आहे याचे काम व्हायलाच पाहीजे. हा एक समाजाचा नेता असला की, मुख्य भाग असतो. माझी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील भंडारी समाजाच्या नेत्यांना विनंती आहे की, तुम्ही रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात प्रत्येक घरातील भंडारी समाजाचा मेळावा घ्यावा. सर्वांना विश्वासात घ्यावे व विधानसभा मतदार संघात भंडारी समाजाचे वर्चस्व आहे त्या मतदार संघात भंडारी समाजाचे किती उमेदवार देणार हे त्यांनी जाहीर करावे. नंतरच आम्ही तुम्हाला मदत करु. अन्यथा वेगळा विचार करु. अशा मेळाव्यालाच जाहीर करावे. आमच्या समाजाचे जे पुढारी आहेत त्यांनी त्या उमेदवारांच्या पाठीमागून पळू नये ते तुमच्या पाठीमागे पळाले पाहीजे. जो समाज 2 टक्के किंवा 3 टक्के आहे त्यांचे तुम्ही आमदार / खासदार करणार हे दुर्दैव आहे. आता भंडारी समाजाने आपल्या हक्काचे निदान रत्नागिरी व सिंधुदुर्गात 5 आमदारांसाठी तरी आग्रह धरला पाहीजे. आमदार निवडून आणण्याची जबाबदारी प्रत्येक भंडारी समाज व त्यांचा पक्ष स्वीकारेल. निदान विधान सभेत तरी आमचे हक्काचे 5 आमदार जातील.भंडारी समाजाला कोणीतरी वाली पाहीजे. नाही तर समाज राजकीय दृष्ट्या नक्कीच दुबळा होईल हे निश्चित असे भावनिक आवाहन मंगेश तळवणेकर यांनी केले आहे.